शिवसेनेतून हकालपट्टीबाबत विचारताच नारायण राणे संतप्त… !

सिंधुदुर्ग : शिवसेना प्रमुखांना खोटं बोलणारी माणसं आवडत नव्हती. म्हणून त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यांचा रोख तुमच्याकडे होता, त्यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? असं विचारताच केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे भडकले. शिवसेनेतून माझी हकालपट्टी?, उगाच काही तरी म्हणू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया देत राणेंनी अधिक बोलणं टाळलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नारायण राणे यांना सवाल करण्यात आला. खोटं बोलणाऱ्यांची शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेतून हकालपट्टी केली होती, असं सांगताना मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण रोख तुमच्याकडे होता, असं राणेंना विचारण्यात आलं. त्यावर राणे भडकले. माझी हकालपट्टी केली? ये उगाच काय ते मला चिडवू नको. माझं नाव नाही घेतलं त्यांनी. काय बोलतो?, असं राणे संतापून म्हणाले. त्यानंतर त्यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरही टीका केली. मुख्यमंत्र्यांनी कोणत्या माझ्या मुद्द्याला उत्तर दिलं नाही. त्यांनी माझ्या एका तरी मुद्द्याला उत्तर दिलं का? त्यांचं एक तरी वाक्य पूर्ण होतं का? पूरपरिस्थिती, वादळाची थकबाकी बाकी आहे. त्यातील एक रुपया तरी त्यांनी दिला का? त्यांनी काय दिलं ते तरी सांगा. विनायक राऊतांनी विमानतळाला विरोध केला होता. हे मी त्यांना सांगितलं. त्यावर ते काहीच बोलले नाही. त्यांच्या भाषणाला मी भाषण मानत नाही. त्यात काही मुद्देच नव्हते. त्यांना आज लिंक लागली नाही. त्यांनी थातूरमातूर भाषण केलं आणि आवरतं घेतलं, असंही ते म्हणाले.
चिपी विमानतळाचं श्रेय माझं नाही तर कुणाचं आहे? पाहुणे येतात आणि जातात. पाहुणे राहतात तरी. मात्र, पाहुण्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांची भूमिका भयानक आहे. मुख्यमंत्री आले आणि गेले. काही संबंध नाही. विकासावर बोलले नाही. कोकणी माणसाला काही दिलं नाही. कोकणाने शिवसेना उभी करायला त्यांना मदत केली. पण शिवसेनेने कोकणी माणसाला काही दिलं नाही, अशी टीका राणेंनी केली.




