राजकारण

बिहारमध्ये मध्यावधी निवडणुका निश्चित : चिराग पासवान

पाटणा : गेल्या काही दिवसांपासून बिहारच्याराजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. लोकजनशक्ती पार्टीमध्ये फुट पडल्यानंतर एकाकी पडलेल्या चिराग पासवान यांनी आता नितीश कुमार आणि केंद्र सरकार विरोधात आघाडी उघडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नितीश कुमार हे पंतप्रधान बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बिहारमध्ये सत्तेत असलेल्या भाजपा आणि जेडीयूमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्कलह सुरू आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणूक लागणे निश्चित आहे. अशा परिस्थितीत लोकजनशक्ती पार्टीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असे चिराग पासवान यांनी म्हटले आहे.

चिराग पासवान नितीश कुमार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, नितीश कुमार यांना पंतप्रधानपद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा आहे. मात्र ते त्यांच्या मनातील गोष्ट अन्य नेत्यांच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. नितीश कुमार वारंवार भाजप आणि केंद सरकारविरोधात काम करत आहेत. त्यामुळेच भाजपा आणि जेडीयूमध्ये तणावाचे वातावरण आहे, असे चिराग पासवान म्हणाले.

त्यांनी सांगितले की, पेगासस प्रकरणात तपास करण्याची केंद्र सरकारची इच्छा नाही आहे. मात्र नितीश कुमार विरोधकांच्या सुरात सूर मिसळून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करत आहेत. तसेच जातींवर आधारित जनगणना, एनआरसी, लोकसंख्या नियंत्रण कायदा अशा निर्णयावरून नितीश कुमार केंद्र आणि भाजपाला विरोध करून पंतप्रधान बनण्यासाठीच्या आपला सुप्त हेतूने आपली महत्त्वाकांक्षा एनडीएवर थोपवत आहे. नितीश कुमार यांची हीच महत्वाकांक्षा बिहारमध्ये मध्यावधी निवडणुकीचे कारण ठरेल, असा दावाही चिराग पासवान यांनी केला.

मागच्या विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष एकटा निवडणूक लढला होता. तरीही पक्षाला सहा टक्के मते मिळाली होती. जर आम्ही सर्व जागा लढवल्या असत्या तर आमच्या मतांचा शेअर दुप्पट झाला असता, असेही ते म्हणाले. राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्याच्या अगदी विरुद्ध राज्यात गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. दररोज हत्या घडताहेत. लोकप्रतिनिधीही येथे सुरक्षित नाहीत, असा टोलाही चिराग पासवान यांनी यावेळी लगावला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button