ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध नाटककार, पत्रकार, लेखक जयंत पवार यांचे निधन झाले आहे. ते ६१ वर्षांचे होते. मराठी भाषेतील एक विचारी, साक्षेपी आणि संवेदनशील लेखक म्हणून त्यांची ओळख होती. पवार यांना शनिवारी रात्री दोनच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्य, नाट्य क्षेत्रासह सगळीकडेच शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे व मुलगी असा परिवार आहे.
जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी २०१२ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. त्यांचे ‘अधांतर’ हे नाटक खूप गाजले होते. २०१४ सालच्या जानेवारी महिन्यात १० ते १२ या तारखांना महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
जयंत पवार यांचे साहित्य…
अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक), दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह), बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक), माझे घर, वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह), वंश, शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक), होड्या (एकांकिका).




