महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन साठा, भ्रष्टाचारी सरकारमुळे जनतेचे हाल : पीयूष गोयल
केंद्र सरकार खोटारडे : नवाब मलिक

नवी दिल्ली : वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. महाराष्ट्रात औषधे तसेच ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता जाणवू लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत पंतप्रधानांना फोन केला होता. तसेच महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी केंद्र सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत असल्याचे म्हटले आहे. यानंतर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी महाराष्ट्र सरकारवर घणाघात केला आहे. महाराष्ट्रच्या भ्रष्टाचारी सरकारमुळे राज्यातील जनतेचे हात होत आहे. महाराष्ट्रात अधिक ऑक्सिजन साठा पुरवण्यात आला असल्याचे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राज्य सरकारकडून वारंवार होणाऱ्या आरोपांवर सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती बिकट असून केंद्र सरकार आरोग्य यंत्रणा पुरवण्यात दुजाभाव करत असल्याचे महाविकास आघाडीतील काहि नेत्यांनी म्हटले होते. तसेच केंद्र सरकारकडून राजकारण सुरु असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यावर आता केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करत राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.
पीयूष गोयल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भ्रष्टाराची सरकारमुळे महाराष्ट्रातील जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. ठाकरे सरकारने गलिच्छ राजकारण थांबवावे, महाराष्ट्राला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण सुरु आहे असा आरोप पीयूष गोयल यांनी केला आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचारी सरकार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे हाल होत आहेत असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासोबत केंद्र सरकार संपर्कात आहे. आतापर्यंत ११० टक्के ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑक्सिजन पुरवण्याचे आश्वासनही दिले आहे. तरी महाराष्ट्र सरकार गलिच्छ राजकारण करत आहे. सरकारने हे थांबवावे आणि जबाबदारीचे भान राखावे असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकार खोटारडे : नवाब मलिक
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या टीकेनंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केंद्र सरकार राजकारण करते आहे. पीयूष गोयलजी तुम्ही सांगा केंद्राने आदेश कधी निर्गमित केला आहे. तुम्ही सांगत आहात भ्रष्टाचार, तुमच्याबाबतीत काय काय भ्रष्टाचाराचे विषय आहेत त्याबाबत मी चर्चा करणार नाही परंतु चर्चा याची आहे की, तुम्ही ऑक्सिजन कधी देणार, कसे देणार, देणार आहे की नाही असा सवाल अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.




