फोकस

मुंबई, उपनगरांसह ठाण्यात सकाळपासून कोसळ’धार’ !

मुंबई : शहर आणि उपनगरात बुधवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता समुद्राला भरती असतानाच मुंबई शहरासह उपनगरात पावसाने जोर पकडला. समुद्रकिनारी वेगाने लाटा धडकत असतानाच दुसरीकडे वारा ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहत होता. याच काळात मरीन ड्राइव्ह, गिरगाव, वरळी, वांद्रे, माहीम, अंधेरी, सांताक्रुझ, विलेपार्ले, गोरेगाव, साकीनाका, कुर्ला, सायन, बी के सी, विद्या विहार, घाटकोपर आणि लगतच्या परिसरात तसेच ठाणे परिसरात बुधवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी दहा वाजेपर्यंत मुंबईत सरासरी दहा ते पंधरा मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

बुधवारी ‘बँक हॉलिडे’ असल्यामुळे बहुतांश मुंबईकर घरीच होते. त्यामुळे रस्त्यांवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शिवाय खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होती. तुलनेने बुधवारी रस्त्यावर तुरळक गर्दी असल्याने फार काही कोणाला त्रास झाल्याचे चित्र होते. मात्र काही कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना मुसळधार पावसाने झोडपले होते. सकाळी साडेदहा वाजता पावसाने आपला जोर किंचित कमी केला. मात्र पावणे अकरा वाजता मुंबईवर पावसाचे काळेकुट्ट ढग जमा झाले. आणि क्षणातच वेगाने पावसाचे टपोरे थेंब मुंबईवर कोसळू लागले. याच काळात वारा देखील वेगाने वाहत असल्याने पावसाने रौद्र अवतार धारण केला. तब्बल पंधरा एक मिनिटे पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला.

मुंबईच्या उपनगरात सकाळी अकराच्या सुमारास कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांना काही काळ धडकी भरवली. विशेषतः अकरा वाजता पावसाने धुमाकूळ घातल्याने जणू काही मुंबईत तुंबेल की काय? अशी भीती देखील नागरिकांना वाटू लागली. सुदैवाने सव्वा अकराच्या सुमारास पावसाचा जोर किंचित कमी झाला. पावसाचा जोर कमी होताच घरात बसलेले मुंबईकर पुन्हा एकदा काहीतरी कामाचे औचित्य साधत पुन्हा एकदा घराबाहेर पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button