Top Newsराजकारण

‘माजी मंत्री म्हणू नका’ असे मी म्हणालोच नव्हतो; चंद्रकांत पाटलांचा सपशेल ‘यू टर्न ‘

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत नव्यानव्या विधानांमुळे चर्चेत असतात. पुण्यात बोलताना त्यांनी केलेल्या एका नव्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे जणू त्यांनी संकेतच दिले होते. पण आता ‘मला माजी मंत्री म्हणू नका असं काही मी म्हणालोच नव्हतो’, असा सपशेल ‘यू टर्न ‘ मारत त्या विधानामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला आहे.

पुण्यात कसबा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या विधानासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, मला माजी मंत्री म्हणून नका असं काही मी म्हणालो नव्हतो. एका प्रसंगावेळी माजी मंत्री बाळा भेगडेंना उद्देशून मी म्हणालो होते, कोणीतरी ही क्लीप तयार केली आणि ती फिरवली.

चंद्रकांत पाटील यांनी अधिक स्पष्ट करताना सांगितलं की, प्रसंग असा आहे की, देहू इथल्या एका सलूनच्या उद्घाटनासाठी मी गेलो होतो, तिथे घोषणा सुरू होती की माजी मंत्री बाळासाहेब भेगडे यांनी यांनी पुढे यावे. तर त्यावर मी म्हणालो की अरे माजी काय म्हणतो चार दिवसाने ते आजी होतील. त्यामुळे त्यात मला माजी मंत्री म्हणून नका असं काही मी म्हणालो नव्हतो. एवढ्या छोट्या गावातही कोणीतरी ही क्लीप तयार केली आणि ती फिरवली. आता सामाजिक जीवनामध्ये एकदा तुमच्या नावाने बील लागलं की एकामागून एक घटना घडत असतात. आता एवढंच म्हणतो की त्यानिमित्ताने महाराष्ट्रात राजकीय चर्चा झाली. माझा कुठलाही हेतू असा नव्हता की मला माजी मंत्री म्हणू नका…

पिंपरी चिंचवड जवळील देहूगाव मधील एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. तेव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल काय होतं, असं म्हणत राज्याच्या राजकारणात तीन दिवसांत संभाव्य भूकंप होणार असल्याचे संकेत चंद्रकांतदादांनी दिले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे मात्र राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा झाल्या. तसंच त्यांच्या वक्तव्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलं. पाटील यांच्या बोलण्याच्या नेमका काय अर्थ असावा, याचे राजकीय कंगोरे उलगण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला.

अजित पवार नक्की राज्याचे उपमुख्यमंत्री की पिंपरी चिंचवडचे

भाजपातील महत्त्वाचे नेते संपर्कात असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विधानांवर बोलत असताना चंद्रकात पाटील म्हणाले की, सनसनाटी बातम्या निर्माण केल्याने काही होत नाही. २० ते २२ महिने झाले असंच चालंय. एकाही आमदाराला ते आमच्या हात लावू शकले नाहीत. कितीही माणसं पळवायचा प्रयत्न केला तरी लोकांचं मोदींवर प्रेम आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नक्की राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी चिंचवडचे, हेच समजत नाही. ते संपूर्ण कोरोनाच्या काळात ते कुठे गेले, नागपूरला गेले, चंद्रपूरला गेले, गडचिरोलीला गेले, भंडाराला गेले? हे जिल्हे कुठे आहेत, हे त्यांना माहितच नाहीत आणि म्हणतात, पिंपरी चिंचवडची महानगरपालिका माझ्या नेतृत्वाखाली होणार. असं म्हणून त्यांनी स्वतःला लहान केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button