आरोग्य

मुंबई महानगर क्षेत्रात १४ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी

मुंबई : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये उभारण्यात येत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्रकल्प कार्यान्वित होतील, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे महानगर प्रदेशात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात टंचाई भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतील प्राणवायू शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पात हवेतून ऑक्सिजन शोषून त्यातून शुद्ध ऑक्सिजन रुग्णांना पुरविण्यात येतो. साधारणत: एका प्रकल्पातून दररोज सुमारे २ टन (९६० एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे २०० रुग्णांना त्याचा पुरवठा करता येऊ शकतो. म्हणजेच या १४ प्रकल्पातून दररोज २८ टन प्राणवायू उपलब्ध होणार असून सुमारे तीन हजार रुग्णांना लाभ होईल असे शिंदे यांनी सांगितले.

मुंबई महानगर क्षेत्रातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेता ठाणे महापालिका क्षेत्रात तीन, कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रत्येकी दोन तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल येथे प्रत्येकी एक प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी संस्थांची निवड करून त्यांना कार्यादेशही देण्यात आला. पुढील काही दिवसांमध्ये ते कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातही दिवसाला एक ते दीड टन प्राणवायू निर्मिती करणारे पाच ते सहा प्लांट उभारण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button