नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसला गळती : कपिल सिब्बल

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षातील आमचे लोक आम्हाला सोडून जात आहेत. सुष्मिता जी पार्टी सोडून निघून गेल्या, फेलेरियो गेले, सिंधिया गेले, केरळमध्ये सुधीरन गेले, जितिन प्रसाद गेले, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. आता प्रश्न पडतो की, ते पक्ष का सोडत आहेत? आपलीच काहीतरी चूक होत असेल, ज्यामुळे अनेकजण पक्ष सोडत आहेत. माझ्या मते पक्षाला नेतृत्व नसल्यामुळे ही गळती होत आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि आता नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे कपिल सिब्बल यांनी टीका करत पक्ष नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
सिब्बल पुढे म्हणाले, मी फक्त एवढेच म्हणेन की प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने पक्षाला आणखी मजबूत करण्याचा विचार करावा. ज्यांनी पक्ष सोडला, त्यांनाही पक्षात परत आणले पाहिजे. आपल्याला मुक्त संवाद संभाषण आवश्यक आहे. आम्ही काँग्रेस कमकुवत होताना पाहू शकत नाही. आता किती दिवस थांबायचे? पक्षाला नेतृत्व हवे आहे. यावेळी कपिल सिब्बल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीची मागणी केली आहे. ते म्हणाले, मागच्या वर्षी काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवून प्रश्न उपस्थित केले, त्या नेत्यांच्या बाजूने मी बोलत आहे. तेव्हापासून आम्ही पक्ष हायकमांडच्या कारवाईची वाट पाहत आहोत. पक्षामध्ये अध्यक्ष, काँग्रेस कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समितीची निवडणूक असावी अशी आमची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.




