Top Newsराजकारण

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार, प्रताप सरनाईकांच्या दंडमाफीची राज्यपालांकडे तक्रार

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या छबय्या विहंग गार्डन दंडमाफी विरोधात आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत मुंबई पालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी निवेदन सादर केलं आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ९ मजली इमारत अधिकृत आणि चार मजली इमारत अनधिकृत अशा इमारतीवर बसलेला ४ कोटी ३० लाख रुपये हा दंड आणि व्याज मंत्रिमंडळ बैठकीत माफ करण्यात आला. ही अत्यंत बेकायदेशीर आणि घटनेच्याविरोधातील गोष्ट आहे. मंत्रिमंडळाने शपथ घेताना अशी शपथ घेतलेली असते की, आम्ही कोणाही एका व्यक्तीला लाभ होईल असे वर्तन करणार नाही.

मात्र अशाप्रकारे अनधिकृत बांधकामांना दंड व्याज माफ केला. या इमारती मोकळ्या करायच्या असतील तर महाराष्ट्राची पॉलिसी ठरवायला पाहिजे होती. हा एका अर्थाने आमदार प्रताप सरनाईकांना फायदा होण्यासाठी घेतलेला निर्णय आहे. ज्याच्यामध्ये अर्थ विभागाने निगेटिव्ह रिपोर्ट लिहिले. तरी एका व्यक्तीला फायदा होण्यासाठी घेतलेला जो निर्णय आहे तो जी मंत्री होताना शपथ जी घेतलेली असते त्याचा भंग करणारा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

यावर राज्यपालांना भेटण्याचा अर्थ हा आहे की, राज्यपालांनी ही शपथ दिलेली असते. त्यामुळे राज्यापालांना आज निवेदन सादर केले, माझे सर्व सहकारी या शिष्टमंडळात होते. यासंदर्भात लोकायुक्तांकडेही वेळ मागितली आहे. नवीन लोकायुक्त पदावर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे सोमवारी उपलोकायुक्तांना भेटून हे निवेदन देणार आहोत. तसेच हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहोत. अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. शिवसेनेची कृत्रिमरित्या तयार झालेली मेजॉरिटी कोणालाही जुमानत नाही. विधानसभा अध्यक्षासाठी झालेली कृती त्याविरोधातही कोर्टात जाणार आहोत. असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button