मुख्यमंत्री ठाकरे भाजपच्या नेत्यांसाठी कार थांबवतात तेव्हा…!

मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनावरून महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष आमनेसामने आले आहेत. कोरोनाचा बहाणा पुढे करून पावसाळी अधिवेशन टाळण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधी पक्षनेते सरकारवर जोरदार हल्ला चढवत असताना विधिमंडळ परिसरात मात्र भाजपचे इतर नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये उत्तम संवाद पाहायला मिळाला.
मुख्यमंत्री ठाकरे त्यांची गाडी चालवत विधिमंडळाच्या बाहेर निघाले होते. त्यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड विधिमंडळ परिसरात उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांची कार थांबवली. त्यानंतर मागच्याच कारमध्ये असलेले शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर स्वत:च्या कारमधून उतरले आणि मुख्यमंत्र्यांच्या कारजवळ पोहोचले.
भाजप नेते, मुख्यमंत्री ठाकरे आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात यावेळी हास्यविनोद रंगला. ही मंडळी तुमची कार अडवत आहेत का, असं नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना हसत हसत विचारलं. त्यावर आम्हाला तसं करण्याची गरज नाही. आम्ही कधीही येऊ शकतो, असं दरेकर यांनी म्हटलं. ‘यांना आताच गाडीत टाकू आणि शिवबंधन बांधू,’ असं पुढे नार्वेकर यांनी गमतीनं म्हटलं. त्यावर आमचं मूळ तेच आहे. आम्ही कधीही येऊ शकतो, असं दरेकर म्हणाले.
भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील व्यक्तीगत सलोखा विधिमंडळ परिसरात पाहायला मिळाला. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लिहिलेलं पत्र समोर आलं असताना शिवसेना आणि भाजपमधील हा सलोखा पाहायला मिळाला. भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, अशा आशयाचं पत्र सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. हे पत्र समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.




