रेमडेसिवीर इंजेक्शनवरील आयात शुल्क हटविण्याचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि पियूष गोयल यांनी मंगळवारी सोशल मीडियावरून दोन मोठ्या निर्णयांची घोषणा केली. औषध स्वस्तात मिळण्यासाठी केंद्र सरकारने अँटी व्हायरल औषध रेमडेसिवीर आणि ते बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंवरील आयात शुल्क हटवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे.
देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिवीरची आवश्यकता पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत (PMGKP) देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना म्हणजे कोविड योद्ध्यांना गेल्या वर्षी देण्यात आलेलं विमा कवच त्यांचा इन्शुरन्स आणखी एका वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली.
करोनाविरोधी लढाईत आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला PMGKP अंतर्गत ५० लाखांचे विमा कवच मिळत होते. ही योजना मार्च २०२० मध्ये सुरू करण्यात आली होती. पण ही योजना २४ मार्चला संपली होती. यानंतर केंद्र सरकारची विमा कंपन्यांसोबत चर्चा सुरू होती. आता केंद्र सरकारने आणखी एक वर्षासाठी या योजनेचा कालावधी वाढवला आहे. देशात करोनाची दुसरी लाट सुरू असताना आरोग्य कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत आरोग्य सुविधा केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटल्समध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय सहायक, सफाई कर्मचारी आणि इतरांना हे विमा कवच मिळणार आहे. या योजनेनुसार देशातील २२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे विमा कवच कायम ठेवण्यात आले आहे.




