
नवी दिल्ली : कन्हैया कुमारने काँग्रेससोबत आपली नवीन राजकीय खेळी सुरू केली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी यावर प्रतिक्रिया देताना कन्हैया कुमारने केलेला काँग्रेस पक्षातील प्रवेश म्हणजे गटारातून नाल्यात पडल्यासारखे आहे, अशी टीका केली.
जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमारने काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानीदेखील यावेळी काँग्रेस परिवारात सामील झाले.कन्हैय्या कुमार गतवेळेच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) मध्ये सामील झाले होते.
कन्हैय्या कुमारने काँग्रेस प्रवेशानंतर पत्रकार परिषदेत म्हटले होते की, या देशात काही लोक, ते केवळ लोक नाही, तर एक विचार आहे. या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कुठे तरी वाचले होते, की तुम्ही सर्वप्रथम तुमच्या शत्रूची निवड करा. मित्र, अपोआप तयार होतील. तर मी निवड केली आहे. लोकशाही पक्षात आम्ही यामुळे सामील होत आहोत, कारण जर काँग्रेस वाचली नाही, तर देशही वाचणार नाही, असे आता वाटू लागले आहे.
यानंतर आता भाजपकडून निशाणा साधण्यात आला असून, कैलास विजयवर्गीय यांनी प्रतिक्रिया देत टीकास्त्र सोडले आहे. जर कोणी गटारातून बाहेर पडून नाल्यात पडला तर मी फक्त त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करू शकतो, असा टोला विजयवर्गीय यांनी लगावला. पश्चिम बंगालच्या भवानीपूर येथून ते बोलते होते.
दुसरीकडे, त्याने (कन्हैया कुमार) स्वतःला माझ्या पक्षातून बाहेर काढले. सीपीआय जातिहीन, वर्गहीन समाजासाठी लढत आहे. त्यांच्या काही वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि ध्येये नक्कीच असतील. कम्युनिस्ट आणि कामगार वर्गाच्या विचारसरणीवर त्याचा विश्वास नसल्याचे यावरून दिसून येते, अशी टीका सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांनी केली आहे.
दरम्यान, जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत. मी जिथे जन्मलो, ज्या पक्षात मोठा झालो, त्याने मला शिकवले, लढण्याची हिम्मत दिली. मी त्या पक्षा सोबतच, अशा लाखो आणि कोट्यवधी लोकांचेही आभार मानतो, जे कुठल्याही पक्षाचे नव्हते, पण कुण्या पक्षाकडून आमच्यावर अनावश्यक आरोप झाल्यानंतर, ते आमच्यासाठी लढत होते. या देशाला केवळ काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते, असे कन्हैय्या कुमारने म्हटले होते.




