
मुंबई : माध्यमं, उद्योगपती आणि विरोधी पक्षातील राजकीय नेते यांच्यावर बेछूट आरोप करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम भाजपकडून सुरु आहे. केंद्रातील सरकारने राज्यातील भाजप नेत्यांना ब्लॅकमेलींग करण्याची परवानगीच दिली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रवक्ते नाना पटोले यांनी केलीय.
माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पटोले म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतक-यांचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशावेळी बेताल वक्तव्ये आणि बेछूट आरोप, स्टंटबाजी करून भाजप नेते जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काल अनंत चतुर्दशी असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाणिवपूर्वक स्टंटबाजी करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही पटोले यांनी केलीय.
आम्हाला भाजपच्या कुठल्याही इशाऱ्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आमचा कोणताही मंत्री दोषी नसल्याने त्यांच्या आरोपांची काँग्रेसला कसलीही भीती नाही. ईडी आणि सीबीआयचा कशाप्रकारे दुरुपयोग केला जातोय, हे सारा देश बघतोय. त्यामुळे कोणीतरी ओरडावं आणि आपण त्याकडे लक्ष द्यावं असं करण्याची काहीच गरज नाही. कारण कर नाही त्याला डर कशाला, असंही पटोले म्हणाले.
किरीट सोमय्यांना त्यांच्या पक्षात किती महत्त्व दिलं जातं, हे मला चांगलंच माहित आहे. पण त्यांना जर खरंच भ्रष्टचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर त्यांनी भाजपमधील भ्रष्टाचारी धेंडांना उघडं करावं. मगच त्यांना खऱ्याअर्थाने जनतेचा पाठिंबा मिळेल. फडणवीस सरकारच्या काळातील काही फाईली काढण्याची वेळ आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही. किती खाल्ले तेही सांगून जावे. मुख्यमंत्र्यांचा स्वभाव गंमत करण्याचा आहे. त्यांच्या पद्धतीने ते बोलले. पण भाजप नेत्यांना दिवसा सत्तेची स्वप्न पडत आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल, असा दावाही पटोले यांनी केला.
भाजप नेत्यांनी आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे काढण्यास सुरुवात केल्याने आघाडी सरकारचे अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता आघाडी सरकारनेही भाजप विरोधात वात पेटवण्याचा निर्णय घेतला आहे. तसा इशाराच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार आहोत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. महाविकास आघाडी एकत्र येऊन फडणवीस सरकारच्या काळातील फायली बाहेर काढणार आहे. तशी वेळच आता आली आहे, असं पटोले म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या रस्ते घोटाळ्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाटील यांनी स्वत: खाल्ले. पण दिसून आले नाही. किती खाल्ले ते त्यांनी सांगून जावे, असंही ते म्हणाले.




