Top Newsराजकारण

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालय परिसरातच मलिकांचा पुतळा जाळला, अनेकांची धरपकड

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केल्यानंतर भाजप कार्यकर्ते मलिकांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आज मंत्रालय परिसरात जोरदार आंदोलन करत मलिक यांचा पुतळा जाळला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याने या परिसरातील वातावरण तापले होते. यावेळी पोलिसांनी भाजयुमोच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज अचानक मंत्रालयावर धडक दिली. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून त्याचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने करण्यात येत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. भाजयुमोचे नेते विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात ही आंदोलने करण्यात आली. यावेळी नवाब मलिक हाय हायच्या घोषणा देत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा देतानाच नवाब मलिक यांचा पुतळाही जाळला. त्यावेळी आंदोलक अधिकच आक्रमक झाले होते. पोलिसांनीच घटनास्थळी धाव घेऊन या आंदोलकांना पांगवले. त्यामुळे आणखीनच गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांनी विक्रांत पाटील यांच्यासह आंदोलकांना पोलसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर आंदोलन अधिकच चिघळलं. आंदोलकांनीही स्वत: अटक करून घेतल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली होती.

औरंगाबादेतही पुतळा दहन

दरम्यान, औरंगाबादमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करत मलिक यांचा पुतळा जाळला. शहरातील क्रांती चौक परिसरात हे आंदोलन सुरु असल्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव याठिकाणी गोळा झाला होता. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button