देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर महाराष्ट्र द्वेषी : भाई जगताप

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. रेमडेसिव्हीरबद्दल फडणवीस आणि दरेकर यांची भूमिका महाराष्ट्र द्वेषी असल्याचा घणाघात जगताप यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील महाराष्ट्र द्वेषी आहेत. त्यांनी फायनान्स सेंटर अहमदाबादला नेलं. फडणवीसही आता गुजरात मॉडेलचं अनुकरण करताना महाराष्ट्र कसा मागे राहील हे पाहत आहेत, असा गंभीर आरोप जगताप यांनी केलाय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ नाही. मात्र, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी त्यांच्याकडे वेळ आहे, अशी टीकाही जगताप यांनी पंतप्रधान मोदींवर केलीय.
फडणवीस हे सत्तेसाठी किती लाचार झाले आहेत. त्यांच्या परवाच्या कृत्यामुळे राज्याचं नाव धुळीस मिळालं. रेमडेसिव्हीरचा साठा केलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी फडणवीस कसे जातात? असा उपरोधिक सवालही भाई जगताप यांनी विचारलाय. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी फडणवीस आणि त्याच्या सहकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणीही जगताप यांनी केलीय. लॉकडाऊन उठल्यानंतर फडणवीस आणि भाजपला सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाही. फडणवीसांची १०० पापे भरली आहेत. रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार, असा इशाराच भाईंनी यावेळी दिलाय.
मुंबईत जिल्हा स्तरावर काँग्रेसकडून टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना कोरोनाबाबतच्या समस्यांसाठी मदत केली जाईल. मुंबई काँग्रेसनं एक हेल्पलाईन नंबरही सुरु केल्याचं जगताप यांनी सांगितलं. 022 – 22621114 या नंबरवर फोन केल्यास तातडीने मदत मिळेल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर मुंबई काँग्रेसकडून दीड हजार बॉटल रक्तपुरवठा करण्यात आलाय. तसंच मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते प्लाझ्माही उपलब्ध करुन देणार असल्याचं जगताप यांनी सांगितलं.




