राजकारण

१२ बलुतेदारांसाठी मुख्यमंत्र्यांना कधी पत्र लिहिणार?

पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रावरुन भाजपचा शरद पवारांना सवाल

मुंबई : पोटावरील शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. कोरोना संकटाच्या काळात अनेक व्यवसाय-धंद्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील समस्यांबाबत पवारांनी लक्ष वेधलं होतं. त्यानंतर आता पवारांनी लक्षद्वीप बेटावर गोमांसावर बंदी येऊ नये यासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. त्यावरुन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवारांना टोला लगावलाय.

पहिले पत्र बार मालकांसाठी तर दुसरे पत्र लक्षद्वीपमध्ये गोवंश हत्या बंदी करू नका म्हणून… लॅाकडाऊनमध्ये नुकसान झाले म्हणून बारमालकांना मदत केली पाहिजे असे पत्र लिहिणारे शरद पवार आता थेट लक्षद्वीप बेटावर गोमांसावर बंदी येऊ नये यासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहितात. महाराष्ट्रात कोकणात वादळ व अन्य भागात अवकाळी पावसाने नुकसान झाले पण शेतकऱ्यांची आणि पशुधनाची चिंता व्यक्त करणारे पत्र ते कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहितील? असा खोचक सवाल केशव उपाध्ये यांनी केलाय.

त्याचबरोबर मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र कधी लिहिणार? १२ बलुतेदारांना मदत मिळाली नाही त्याची विचारणा करणारे पत्र राज्यसरकारला पवार साहेब कधी लिहीणार?’, असे प्रश्न विचारत उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी लक्षद्वीपच्या नवनियुक्त प्रशासकांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या संदर्भात लक्षद्वीपचे खासदार पी.पी. मोहम्मद फैजल यांनी उपस्थित केलेल्या काही गंभीर विषयांकडे मोदींचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. लक्षद्वीपमध्ये प्राणी संरक्षण कायदा बनवला जात आहे. यातून गाय आणि बैल यांच्या हत्येवर बंदी घातली जाणार आहे. तर दुसऱ्या एका कायद्यात दारुचा व्यवसाय वाढवण्याची योजना आहे. लक्षद्वीब हा बऱ्याच कालावधीपासून मद्यपान न करणारा प्रदेश राहिला आहे. तर इथले बरेच लोक मांसाहारी आहे. त्यामुळे नव्या कायद्याबाबत लोकांमध्ये नाराज असल्याचं मत खासदार मोहम्मद फैजल यांनी व्यक्त केलाय. त्यावरुन पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button