आरोग्य

देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला

नवी दिल्ली : देशभरात सध्या कोरोनाचा उद्रेक सुरू असून दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत होते. गेल्या काही दिवसांपासून देशातील रुग्णसंख्येने ४ लाखांचा टप्पा पार केल्याचे दिसत होते. मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी देशाच्या बाधित रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशात सोमवारी दिवसभरात ३ लाख २९ हजार ९४२ नवीन रुग्ण सापडले. तर ३ लाख ५६ हजार ८८ जण कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात ३ हजार ८७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

भारतातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा २ कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ वर पोहोचला आहे. आतापर्यंत २ लाख ४९ हजार ९९२ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत देशात १ कोटी ९० लाख २७ हजार ३०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३७ लाख १५ हजार २२१ इतके रूग्ण सध्या सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यासह देशभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू असताना आतापर्यंत १७ कोटी २७ लाख १० हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. भारतात आतापर्यंत ३० कोटी ५६ लाख १८७ जणांची कोरोना चाचणी झाली आहे. यात सोमवारी दिवसभरात १८ लाख ५० हजार ११० जणांची कोरोना चाचणी झाल्याची माहिती आय़सीएमआरने दिली आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासात ३७,३२६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात सोमवारी ५४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. कोरोनाचा प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. परंतु कोरोनाचे नियम नागरिक पालन करत नसल्यामुळे रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासात ६१,६०७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आत्तापर्यंत एकूण ४४,६९,४२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९७ टक्क्यांवर पोहोचले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button