सर्वसामान्यांचं पेट्रोल बंद करून निर्बंध वाढवण्याचा सरकारचा विचार

मुंबई : राज्यातील विविध भागात रस्त्यांवर, किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन आता अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे दोन दिवसांत कडक कारवाई केली जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. तहसीलदारांच्या पत्रानुसार फक्त अत्यावश्यक सेवेसाठी इंधन दिले जाणार असून, त्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. त्यानुसार राज्यात संचारबंदी आदेश लागू असणार आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलंय. मात्र, राज्यातील विविध भागात रस्त्यांवर, किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन आता अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय.
मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा राज्यातील विविध भागात रस्त्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये किराणा दुकान, भाजीपाला मार्केट, मुंबईतील लोकलमध्येही लोकांची वर्दळ पाहायला मिळाली. त्यामुळे सरकारकडून लॉकडाऊन अधिक कडक करण्यात येणार आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. लोकल सेवेचा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी वगळून इतरांनी वापर केल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार आहे. लोकल सेवा वापराबाबत कडक निर्बंध करावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी झाल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलं.
परप्रांतिय कामगारांना घरी जाण्यासाठी सूट दिली आहे. त्याचा फायदा घेऊन खासगी आणि सार्वजनिक वाहतूक केली जात आहे. आम्ही अजून एक दिवस जनतेला विनंती करतो अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला आणि किराणा यांना दिलेली सूट रद्द करता येईल का? याबाबतही सरकार विचाराधीन असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिलीय.
रुग्णवाढीप्रमाणे बेड्सही वाढलेच पाहिजेत, आरोग्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागावर जास्त भर पडला असून आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. रुग्णांसाठी उपचार करण्यासाठी बेड्सपासून ते औषधांपर्यंतच्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहे. याच अनुषंगाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना आज राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश आणि सूचना दिल्या. यावेळी त्यांनी रुग्णवाढीप्रमाणे बेड्स वाढलेच पाहिजे. बेड्स नाही असं उत्तर कदापि सहन करणार नाही, असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
पुढे आरोग्यमंत्री म्हणाले की, रुग्णालयात जर जागा नसेल तर इन्स्टिट्यूशनल ठिकाण वाढवा. जे कोणतेही रुग्णालय असेल तिथले ८० टक्के बेड्स ताब्यात घेतले पाहिजे, अशा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार झाले पाहिजे. रुग्णांकडून कोणत्याही प्रकारे वाढीव बील आकारू नये. ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगच्या टक्केवारीत वाढ झाली पाहिजे, अशी सूचना सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावर देण्यात आली आहे.
गृहविलगीकरणात घरातील इतरांना त्रास होता कामा नये. लक्षणे आढळल्याने त्वरित चाचणी करणे गरजेच आहे. तसेच २४ तासांच्या आत आरटीपीसीआर चाचण्याचे रिपोर्ट आलेच पाहिजे. तसेच गरज भासत असेल तर रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा वापर करा. इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन झाले तर संसर्गाचे प्रमाण कमी होईल, असे राजेश टोपे म्हणाले.




