आरोपांना उत्तर देऊन त्यांना मोठे करणार नाही; राणेंच्या टीकेला सामंतांचे प्रत्युत्तर
ईडीच्या छाप्याची पूर्वसूचना केंद्रीय मंत्र्याला मिळत असेल, तर कारभार कसा चालतो ते दिसते !

रत्नागिरी : ईडीची छापा कोणत्या नेत्याच्या घरावर पडणार आहे, तो कधी पडणार आहे? हे जर केंद्रातील मंत्र्यांना कळत असेल तर ईडीचा कारभार कसा चालतो याबाबत काय बोलणार असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. कोणी जर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले तर मी त्याला प्रत्युत्तर देत बसणार नाही. कारण मला उगच कोणाला मोठे करायचे नाही असा टोला देखील राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.
राणे यांच्या मुंबईच्या जुहूमधील बंगल्याची काल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पहाणी केली. या बंगल्याचे काही बांधकाम अतिक्रमणात जात असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून राणेंच्या बंगल्याची पहाणी करण्यात आली. दरम्यान यानंतर नारायण राणे यांच्याकडून उदय सामंत आणि शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे. राणे यांच्या आरोपांना सामंत यांनी देखील प्रत्युत्तर दिले. मी कोणाच्याही घराची चौकशी लावली नाही. मला तसले प्रकार जमत देखील नाहीत. मी निवडणुकांच्या मौदानात उत्तर देणारा कार्यकर्ता आहे. मी राणे यांच्या घराची चौकशी लावण्यासाठी काही केले असेल, किंवा साधा फोन जरी केला असेल तर मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे, असं उदय सामंत यांनी म्हटले आहे.
मी कोणाच्याही घराची चौकशी लावली नाही, मी जर यासाठी काही केले असेल किंवा साधा फोन जरी केला असेल तर मी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार आहे. मी कोणाचेही घर पाडण्याचे पाप करत नाही. मी असले राजकारण करत नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातूनच उत्तर देतो. कोणाचे मजले सहा आहेत की सात याचे मला काहीही देणे -घेणे नाही. कोणाचे घर किती मोठे आहे हे मी कधी मोजले नाही. त्यामुळे मी कोणाच्या घराची चौकशी लावली नाही आणि कोणाला पाठिशी देखील घालणार नसल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.




