
नाशिकः आमच्याकडे तर खूप टोल नाके आहेत आणि आजकाल रस्त्यांपेक्षा टोल नाक्यांनाच महत्त्व आलं आहे. त्यावर तर काय काय चालतं, असं म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलासह तब्बल २०४८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण नाशिकमध्ये करण्यात आले. मनोहर गार्डन येथे हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. यावेळी छगन भुजबळांनी आपल्या भाषणातून चौफेर फटकेबाजी केली. सोबतच शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यावर अगदी शेलक्या शब्दांत बोचरी टीका केली. भुजबळ म्हणाले, काहींची नावं घेतली नाही तर वेगळं वळण मिळतं. त्यामुळे सर्वांची नावं घ्यावी लागतात. विशेषतः आमदारांची नावं मला घ्यावी लागतात. खरं तर जगाच्या पाठीवर कुठेही मोठे रस्ते आणि विकास करायचा असेल, तर टोल हा द्यावाच लागतो. टोल सर्वांनी द्यायला पाहिजे. आमच्याकडे तर खूप टोल नाके आहेत आणि आजकाल रस्त्यांपेक्षा टोल नाक्यांनाच महत्त्व आलं आहे. त्यावर तर काय काय चालतं? असे म्हणत शिवसेना आमदार सुहास कांदे यांना नाव न घेता टोला लगावला. शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या माणसांनी आपल्या कार्यकर्त्यांना मारल्याचा आरोप रिपाइं (ए) नेते अक्षय निकाळजे यांनी केला होता. त्या अनुषंगाने भुजबळ यांनी ही टीका केली. विशेष म्हणजे भुजबळांनी आमदार कांदे हे प्रसिद्धीसाठी आपल्यावर आरोप करत असल्याचे म्हणत, त्यांना प्रत्युत्तर देणार नाही. आपल्याकडून विषय संपला, अशी जाहीर भूमिका घेतली होती. त्यानंतरही त्यांनी कांदे यांचे नाव न घेता शेलक्या शब्दांत टीका केली, त्याची खुसखुशीत चर्चा सुरू होती.
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी नियोजन समितीचा निधी विकल्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळांविरोधात याचिका दाखल केली आहे. ही याचिका मागे घ्यावी म्हणून आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे कांदे यांनी म्हटले होते. मात्र, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले होते. आमदार सुहास कांदे यांचे भाऊ टोलनाका चालवतात. या टोलनाक्यावर आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यासाठी मी सुहास कांदे यांना फोन केला. त्यांना फोनवर मी कुठलीही धमकी दिली नाही. छगन भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या, असे म्हणालो नाही, असा दावा केला होता. त्यानंतर कांदे यांनी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांचा उल्लेख भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नव्हे प्राचार्य असा केला. आता पुन्हा भुजबळांनी आपल्याकडून विषय संपला म्हणत असतानाही टीका केली. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद चिघळणार आहे.




