१२ आमदारांची नियुक्ती हा सरकार आणि राज्यपालांमधील विषय : फडणवीस

मुंबई – विधान परिषदेवरील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत आपण योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले. या तिघांनीही सायंकाळी राज्यपालांची भेट घेऊन या नियुक्ती लवकरात लवकर करण्याची विनंती केली. या रखडलेल्या प्रश्नासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले, त्यावेळी तो राज्यपाल आणि राज्य सरकारचा प्रश्न असल्याचं एका वाक्यात उत्तर त्यांनी दिलं.
या भेटीनंतर फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, राज्यपाल आणि राज्य सरकार या दोघांमधील हा प्रश्न आहे, असे म्हणत एका वाक्यात त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. तसेच, या प्रश्नावर प्रतिक्रिया द्यायचा आमचं कारण नाही. त्यांनी काय यादी पाठवली, कधी यादी पाठवली हे आम्हाला माहिती नाही, नावं कुठली पाठवली हेही आम्हाला माहिती नाही. त्यामुळे, राज्यपालांसोबत त्यांची काय चर्चा झाली, हेही आम्हाला माहिती नाही, असे फडणवीस यांनी म्हटलं.




