
मुंबई : महाराष्ट्रभरात पावसानं हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात एकूण १० ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये ८० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी राज्य सरकारकडून पूरग्रस्त जिल्ह्यांना मदतनिधी वितरित करण्यात आला आहे. तशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. भुजबळ यांनी आज राज्य आपत्ती निवारण कक्षात जात राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पूरस्थिती आणि मदतकार्याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी तत्काळ मदत म्हणून प्रत्येकी २ कोटी आणि इतर जिल्ह्यांसाठी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. तसंच अलमट्टी धरणातून साडे तीन लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे. रायगडमध्ये अद्याप ५३ जण बेपत्ता आहेत. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही धोका कायम आहे. मदतकार्य करणारी पथकं तैनात आहेत. त्यात राज्य आपत्ती व्यवस्थान विभाग, एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, विविध संस्थांचा समावेश आहे, असं भुजबळांनी सांगितलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागात आतापर्यंत एनडीआरएफच्या ३४, एसडीआरएफच्या ४ टीम तैनात आहेत. आतापर्यंत ८२ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. ७५ जनावरांचा मृत्यू झाला, तर ३८ जण जखमी झाले असून ५९ नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. ९० हजार ६०४ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
‘म्हाडा’ने स्वीकारली तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी
कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे.
मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती. pic.twitter.com/vdtJLl33gF
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 24, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावची परिस्थिती पाहिली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्या पुनर्वसनाचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेलं तळीये हे गाव पूर्ण वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.
‘कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती’, असं ट्वीट करुन जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाने घेतलेल्या जबाबदारीची माहिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायानं जितेंद्र आव्हाड यांच्या या निर्णयामुळे तळीये गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.




