शिक्षण

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्टला !

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे सातत्याने पुढे ढकलण्यात आलेली इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा आता ८ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले. शालेय शिक्षण विभागाने परीक्षा घेण्यासाठी मान्यता दिली असून, कोरोना नियमांचे पालन करून ही परीक्षा होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. पाचवी आणि आठवीत असलेले विद्यार्थी आता पुढील वर्गात गेले असले तरी ही परीक्षा देता येणार आहे.

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय व्हावी या उद्देशाने दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. परिषदेमार्फत घेण्यात येणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षेला यंदा राज्यभरातून ६ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ८८ हजार ३३५ तर आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ४४ हजार १४३ इतकी आहे. राज्यातील ४७ हजार ४६२ शाळांमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

परीक्षा घेण्यासाठी राज्यभरामध्ये ५ हजार ६८७ इतकी केंद्र आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मे रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सध्या राज्यात आटोक्यात असलेली कारोनाची परिस्थिती लक्षात घेता कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर शालेय शिक्षण विभागाने ही परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. ८ ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेण्याबाबत सूचना परीक्षा परिषदेला देण्यात आल्या आहेत. यामुळे आता ही परीक्षा होणार आहे.

मुले व्हायरल इन्फेक्शनचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यामुळे आधी प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्यावर विचार करणे योग्य ठरेल, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने व्यक्त केले आहे. देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली गेलेली असताना, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी चौथ्या राष्ट्रीय सेरोसर्वेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button