
लंडन : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचा अडीच तासांचा खेळ पावसामुळे वाया गेला. पाऊस थांबला असला तरी मैदानावर पाणी असल्यामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. बीसीसीआयनं ट्विटवरून ही माहिती दिली. सुरुवातीला लंच टाईमपर्यंत खेळ थांबवण्यात आला होता, परंतु तोपर्यंत पावसानं बरेच नुकसान केले होते.
आयसीसीनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी २३ जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. जर कसोटी सामन्यातील वाया गेलेला वेळ पाच दिवसांच्या खेळात भरून न निघाल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल. वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी पुढील दिवशी सामना ३० मिनिटे आधी सुरू केला जाईल किंवा दिवसअखेर ३० मिनिटांचा अधिक खेळ होईल. पण, आता या कसोटीचा पहिलाच दिवस पावसामुळे वाया गेल्यानं राखीव दिवसाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यातही निकाल न लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद दिले जाईल.




