राज्याभिषेक सोहळ्यासाठी ६ जूनला रायगडावर येण्याचे संभाजीराजेंचे आवाहन

मुंबई : मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाल्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाचं वातावरण होतं. त्यावर संयम राखत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला. यावेळी त्यांनी अनेक बड्या नेत्यांची भेट घेतली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी थेट सरकारला अल्टिमेटम दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ६ जूनपर्यंत तोडगा निघाला नाही तर थेट रायगडावरूनच घोषणा होईल असा इशाराच संभाजीराजे यांच्या कडून देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर यासंबंधी पाच महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदनही सरकारपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते यावर बोलत होते.
मराठा आरक्षणावर ५ मे रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला पण त्यानंतर आक्रमक मराठा समाजाला शांत राहण्याचा आवाहन मी केलं. त्यामुळे राज्यात कुठलाही उद्रेक झाला नाही. परंतु, आता ६ जूनपर्यंत आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर थेट रायगडावरून यासंबंधी घोषणा होईल. यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी मिळेल ते वाहन पकडून राज्याभिषेक सोहळ्या दिवशी रायगडावर घेण्याचं आव्हान मराठा बांधवांना केलं आहे.
खरंतर, करोनाचा धोका रोखण्यासाठी राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांना निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे ६ जूनला मराठा समाज रायगडावर गर्दी करेल का? असा प्रश्न समोर येत आहे. दरम्यान, जर असं झालं तर यामुळे करोनाचा धोका आणखी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.



