महाराष्ट्रातही कोरोनाचे ६७ हजार ४६८ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात मंगळवारपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा ६० हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार ४६८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६८ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख २७ हजार ८२७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६१ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज ५४ हजार ९८५ रुग्ण बरे होऊन घरी असून आतापर्यंत एकूण ३२ लाख ६८ हजार ४४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१५ एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४ टक्के एवढा आहे.
बुधवारी नोंद झालेल्या एकूण ५६८ मृत्यूंपैकी ३०३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०५ मृत्यू, रायगड- २०, औरंगाबाद- १५, बुलढाणा- १०, नाशिक- ९, भंडारा- ८, पुणे- ७, ठाणे- ७, कोल्हापूर- ५, परभणी- ५, अहमदनगर- ३, चंद्रपूर- ३, नागपूर- ३, जळगाव- २, नांदेड- २, सातारा- २, बीड- १, नंदुरबार- १, सांगली- १ आणि सिंधुदुर्ग- १ असे आहेत.




