मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ममता बॅनर्जी आणि राज्यपालांमध्ये शाब्दिक चकमक

कोलकाता: ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. राजभवनात एका छोटेखाना कार्यक्रमात हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी कोरोना संकटाचा सामना करणं हे आपलं प्राधान्य असल्याचं सांगितलं. तर, राज्यपाल जगदीप धनखड यांनी दीदींना राजधर्माची आठवण करून देत बंगालमधील हिंसेवर चिंता व्यक्त केली. त्याला ममता दीदींनीही तत्काळ उत्तर दिलं.
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये शपथविधी सोहळ्यानंतर वाजल्याच्या घटना तशा अत्यंत दुर्मिळ आहेत. ममतादीदींनी शपथ घेतल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली ती अशी…
शपथविधी सोहळ्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मीडियाशी संवाद साधला. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण आणणं हे आमचं पहिलं प्राधान्य असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. या मुद्द्यावर दुपारी बैठक बोलावल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच बंगालमधील जनतेने शांत राहावं. सर्वच राजकीय पक्षांनी संयम बाळगावा, असं आवाहन त्यांनी बंगालमधील हिंसेच्या पार्श्वभूमीवर केलं. बंगालमध्ये अशांती असणं योग्य नाही. सर्वांनी संयमाने राहावं. हिंसा करू नका. आजपासून आमचं सरकार कायदा आणि सुव्यवस्था हातात घेत आहे. अशावेळी राज्यात शांतता प्रस्थापित करणं ही आमची प्राथमिकता आहे. जे लोक हिंसेत सहभागी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यपालांचा सल्ला
राज्यपाल जगदीप धनखड यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्याबद्दल ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या. सरकार संविधान आणि कायद्याच्या तत्वाने चालेल अशी आशा करतो. भारत हा मोठा लोकशाही देश आहे. येथील सरकारने कायद्याने चालतात. सध्या आपण संकटाचा सामना करत आहोत. बंगालमध्ये हिंसा भडकल्याचा रिपोर्ट मला मिळाला आहे. मी मुख्यमंत्र्यांना याची माहिती दिली आहे. निवडणुकीनंतर राज्यात हिंसा भडकणं हा लोकशाहीला धोका आहे, असं धनखड म्हणाले. मुख्यमंत्री राज्यात लगेच कायद्याचं राज्य प्रस्थापित करतील याची मला आशा आहे. स्त्रिया आणि मुलांचं जे नुकसान झालं आहे. त्यांना प्राधान्याने मदत मिळावी. नवे सरकार राज्यासाठी काम करेल अशी आशा आहे. बंगालमधील हिंसेप्रकणी माझी छोटी बहीण, ममता बॅनर्जी तात्काळ अॅक्शन घेईल. सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणं वाटतं तितकं सोपं नाही. नव्या पद्धतीने त्या राज्य करतील अशी आशा आहे, असंही ते म्हणाले.
ममतांचा पलटवार
राज्यपालांनी ममता बॅनर्जींना अप्रत्यक्षपणे राजधर्माची आठवण करून दिल्याने ममता बॅनर्जी यांनीही त्यांच्यावर पलटवार केला आहे. राज्याच्या सर्वात मोठ्या संवैधानिक पदावर राज्यपाल असतात. ते बोलल्यानंतर पुन्हा बोलायचं नसतं. असे राजकीय संकेत आहेत, मात्र ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर तत्काळ उत्तर दिलं. ममता दीदींनी तत्काळ हातात माईक घेतला आणि मी आजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हे राज्य निवडणूक आयोगाच्या हातात होतं. आयोगाने या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ज्या लोकांनी काही काम केलं नाही, अशा लोकांच्या नव्या नियुक्त्याही केल्या. अशा परिस्थितीत मी राज्याची सूत्रे हाती घेत आहे आणि लोकांना शांतता राखण्याचं आवाहन करत आहे.
मोदींच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ममता दीदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. त्यांचे अभिनंदन, असं मोदींनी म्हटलं आहे. तर ममता बॅनर्जी या पूर्वेतील वाघिणी आहेत. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी ही मोठा विजय प्रेरणा देत आहे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.




