विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानानेच होणार !

मुंबई : नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर अद्याप अध्यक्षांची निवडणूक झालेली नाही. त्यावरुन भाजप नेते सातत्याने राज्य सरकारवर हल्ला चढवत आहेत. अशावेळी आता विधानसभा अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदानानेच होणार आहे. नियम समितीच्या आज पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. २२ डिसेंबरला विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नियम बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, नियम समितीच्या बैठकीत भाजप सदस्य डॉ. संदीप धुर्वे, जयकुमार गोरे, धनंजय गाडगीळ यांनी नियम बदलाला तीव्र विरोध केला. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अध्यक्ष आणि सभापती निवडीबाबत गुप्त मतदानाची पद्धत आहे. ही पद्धत महाराष्ट्रात बदलण्यासाठी कोणतेही ठोस कारण नसताना हा निर्णय का घेतला जात आहे? असा सवाल भाजप सदस्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र हा देशाला दिशा देण्याचं काम करतो. विधानसभेच्या अमृत महोत्सवी वर्षात हा नियम बदलण्यामागे नेमके कारण काय? असा सवालही भाजपने उपस्थित केलाय. तसंच भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या दिवशी म्हणजे ६ जुलैला झालेल्या नियम समितीच्या बैठकाला भाजप सदस्यांना हेतुपुरस्सर बोलावण्यात आलं नाही, असा आरोपही भाजप सदस्यांनी केला आहे. या बैठकीत नियम बदलण्याच्या विषयावर चर्चा झाली होती. नियम समितीच्या बैठकीत नियमबाह्य कृती केल्याचा भाजप सदस्यांचा आरोप आहे. त्यावर २२ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत चूक मान्य करताना ती अनावधानाने झाल्याचं उपाध्यक्षांनी मान्य केलं आहे.
हिंमत असेल तर गुप्त मतदान घ्या, चंद्रकांत पाटलांचं आव्हान
सर्वसामान्य लोकांप्रमाणेच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधीसुद्धा या सरकारला कंटाळले असल्याने गुप्त मतदानाची संधी मिळताच त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केले आणि विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला, बुलढाणा, वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार मोठ्या आघाडीने विजयी झाले. हिंमत असेल तर महाविकास आघाडीने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मूळ नियम आणि परंपरेप्रमाणे गुप्त मतदानाने घ्यावी, असं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं.




