जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद नष्ट करणार : अमित शाह

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद नष्ट करून नागरिकांच्या हत्यांना पूर्णविराम देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे केले. ते म्हणाले, कोणालाही शांतता आणि विकासात अडथळे आणू दिले जाणार नाहीत.
शाह म्हणाले, ‘या केंद्रशासित प्रदेशात १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आधीच आली आहे आणि स्थानिक युवकांना ५ लाख रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी २०२२ अखेर एकूण ५१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सरकारचे लक्ष्य आहे. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील ३७० वे कलम ५ ऑगस्ट, २०१९ रोजी रद्द केल्यानंतर प्रथमच शाह जम्मू आणि काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.
भगवतीनगरमध्ये जाहीर सभेत बोलताना शाह यांनी नॅशनल काॅन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष व काँग्रेसचे नाव न घेता म्हटले की, गेल्या ७० वर्षांत जम्मू आणि काश्मीरच्या विकासाला आलेल्या अपयशाचे उत्तर देण्याची जबाबदारी तीन कुटुंबांची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा नवा अध्याय जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू झाला आहे. परंतु, त्यात अडथळा आणण्याचे हानिकारक तत्त्वांचे प्रयत्न सुरू आहेत. शांतता आणि विकासात कोणीही अडथळे आणू शकणार नाही याची खात्री देण्यासाठी मी येथे आलो आहे, असे ते म्हणाले.




