
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नेहमीच ठाकरे सरकारवर तोफा डागत असतात. आता फडणवीसांनी मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना एक शंका उपस्थित केलीय. ही शंका साधीसुधी नसून मुंबई महानगरपालिकेतील व्यवहाराची चौकशी व्हावी याकरिता मुंबई महानगरपालिकेचे स्पेशल कॅग ऑडिट करायला हवे, असे मत फडणवीसांनी व्यक्त केले आहे. कोरोनाकाळात ठाकरे सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. अशातच फडणवीसांच्या या शंकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाकरे सरकारमध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार पहायला मिळत आहे. मला वाटत नाही देशात इतका भ्रष्टाचार दुसरीकडे कुटे पहायला मिळाला असेल, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली आहे. काही महिन्यातच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. तीन दशकांपासून सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला खाली खेचण्यासाठी भाजप पूर्ण जोर लावत आहे. त्यामुळे सध्या राजकारणातला माहोल गरमागरमीचा आहे.
गेल्या दीड वर्षात मुंबईतला भ्रष्टाचार मी पाहत आहे.कोरोनाचा बहाना करून भाजपच्या नेत्यांना बोलू द्यायचे नाही. स्थायी समिती जाणीवपूर्वक ऑनलाईन घ्यायची आणि भाजप नेत्याना म्युट करून टाकायचे, असे कारस्थान सुरू असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे. पालिकेने जे निर्णय घेतले. आज त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे म्हणत त्याची कॅग मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे ऐन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी फडणवीसांनी केलेली ही मागणी सत्ताधारी शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या तीन दशकापासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र राज्यात शिवसेने पहिल्यांदाच वेगळा घरोबा केल्यामुळे भाजपकडून सेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ज्यांना अनुभव नाही, त्यांना कोविड सेंटर दिले. तुम्ही पैसा खाल्ला. पण, त्या कोविड सेंटरमधील बळींची जबाबदारी घेणार का?
मुंबई महापालिकेचे स्पेशल सीएजी ऑडिट करावे, अशी आमची मागणी असणार आहे. यावेळी परिवर्तन अटळ आहे!
माझे मनोगत…
https://t.co/8vPuRbi3QH#ShivJayanti #शिवजयंती #Mumbai— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2022
सध्या राज्यात आरोप प्रत्यारोपावरून राजकारण पेटलेलं असताना फडणवीसांची ही मागणी नवं ट्विस्ट आणणार का? याकडेही सर्वाचे लक्ष लागलं आहे. एकीकडून फडणवीस तर दुसरीकडून किरीट सोमय्या यांनी शिवसेनेविरोधात सध्या जोरदार रान पेटवलं आहे. शिवसेनेकडूनही संजय राऊत सध्या जोरदार खिंड लढवत आहेत. एवढेच नाही तर या वादात केंद्रीय मंत्री नारायण राणेही शिवसेनेवर जोरदार प्रहार करत आहेत. हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आणि आता फडणवीसांच्या या नव्या मागणीला शिवसेना काय प्रतिसाद देणार? हेही पाहणं तेवढच महत्वाचं आहे.
काही लोक समजत असले महाराष्ट्र कुणाची खाजगी मालमत्ता नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला शिकवण दिली की, आपण मालक नाही, तर जनतेचे सेवक आहोत आणि तेच ब्रिद घेऊन भाजपाचा प्रत्येक नेता, कार्यकर्ता काम करीत असतो. #शिवजयंती pic.twitter.com/IcL7WolqSc— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2022
महाराजांचे कार्यक्रम अडवणाऱ्यांना महाराजच शिक्षा करतील !
मुंबईतल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना पुन्हा जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून बोलताना, महाराजांचे कार्यक्रम अडवणाऱ्यांना महाराजच शिक्षा करतील, अशी टीका केली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यक्रम कोण अडवतंय? असा सवालही उपस्थित झाला आहे. तसेच ही फक्त जयंती नाही, या राजाने लढायला शिकवलं. शत्रू कितीही मोठा असूद्या तुमचा विजय होतो. या लढाईत सामान्य मानसाचा विजय होईल, असे सूचक विधानही फडणवीसांनी केले आहे.
#शिवजयंती च्या कार्यक्रमाला इतके निर्बंध लावले जातात, तेव्हा आपण कुणाच्या राज्यात राहतो, असा प्रश्न निर्माण होतो.
शिवछत्रपती स्मरायचे तर असतातच, पण जगायचेही असतात.
पण, काही महाराजांना केवळ भाषणापुरते मर्यादित ठेवतात.#ShivJayanti #ChhatrapatiShivajiMaharajJayanti pic.twitter.com/8WW8lI1Wjp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2022
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही जातीची संख्या न पाहता वंचितांचे राज्य उभारले. राम राज्यानुसार सर्वांना समान अधिकार दिले. तेच सूत्र पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कल्याणकारी सरकार चालविले जात आहे. तसेच दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.आमचा भगवा आठवण करून देतो त्यागाची. ज्या काळात महाराष्ट्रावर अत्याचाराची मालिका सुरू होती. त्या काळात एका क्रांतीचा जन्म झाला. ती क्रांती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी आठरपगड जातींना एकत्रित केलं. मावळ्यांची संख्या कमी होती. पण ते लाखांना भारी होते. या लढवय्या मावळ्यांना पाहून औरंगजेबही अचंबित झाला होता. शिवाजी महाराजांना परास्त का करू शकत नाही? असा सवाल त्यांनी केला होता. त्यावेळी, औरंगजेबाच्या दरबारींनी जे उत्तर दिलं ते थक्क करणारं होतं. आपलं सैन्य लढतं ते आपल्याकडे नोकर आहे म्हणून. शिवाजी महाराजांचे मावळे हे स्वत: करता लढत नाहीत. तर रयतेसाठी लढत असतात. त्यामुळेच ते आपल्याला पराजित करत असतात. जोपर्यंत मावळ्यांच्या रक्तात, विचारात आणि कृतीत शिवाजी आहे तोपर्यंत ते पराजित होऊ शकणार नाही, असं उत्तर औरंगजेबाला देण्यात आलं, असं फडणवीस यांनी सांगितलं.
राज्यपालांचं मोठं विधान
या कार्यक्रमात भाषण करताना राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मोठं वक्तव्य केलं. “राजकारणात जो आपला विरोध करतो तो उद्या आपल्या सोबतही असेल”, असं कोश्यारी यावेळी म्हणाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज्यपाल नेमकं शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून हे म्हणाले? हा प्रश्न मात्र खरंच अनुत्तरीत राहिला आहे.
दरम्यान, समाजात अनेक वाईट गोष्टी आहेत. त्याविरोधात संग्राम करावा लागेल. संग्राम प्रेमानेही करता येतो. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे आहेत असे नाही. अन्य राज्यातही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे माहीत आहे. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे शक्ती कमी नव्हती पण शिवाजी महाराज यांच्याकडे शक्ती, भक्ती बरोबर युक्तीही होती, असंदेखील राज्यपाल यावेळी म्हणाले.
दरेकर काय म्हणाले?
आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एप्रिलमध्ये चिंता दूर होणार असल्याचं विधान केलं. त्यांच्या याच विधानाचा धागा पकडत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी, एप्रिल महिन्यात ठाकरे सरकारचा बाजा वाजवून टाकू, असं विधान केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी राजकारण होऊ नये. सरकार केवळ राजकारणासाठी छत्रपतींचे नाव घेतं. नागपूरमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला परवानगी दिली जाते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला परवानगी दिली नाही तर आम्ही खपून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात कायदा-सुव्यस्था होती. आता राज्यात अत्याचार होत आहेत. कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत. शिवशाहीच्या नावाने जनतेत जात असतांना थोडे तरी शिवाजी महारांचे विचार घ्यायला हवेत. बोलाची कडी, बोलाचा भात, असा सरकारचा कारभार सुरु आहे. दरवर्षी दिमाखदार असा सोहळा या शिवतीर्थावर साजरा करणार. एप्रिलमध्ये सगळ्या चिंता दूर होणार आहेत, असं बोलून प्रवीण दरेकर यांनी आपलं भाषण संपवलं.
प्रवीण दरेकर यांच्या भाषणानंतर रामदास आठवले यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी दरेकरांचा शेवटच्या मुद्द्याचा पदर घेत काव्यात्मक पद्धतीने भाषणाला सुरुवात केली. एप्रिलमध्ये काहीतरी नवीन घडेल असे प्रविण दरेकर, चंद्रकांतदादा म्हणतात, शिवाजी महाराज आहे आमचा लाडका राजा, वाजवून टाकू ठाकरे सरकारचा बाजा, अशा शब्दांत रामदास आठवलेंनी टीका केली.




