मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत तापणार; शिवसेना खासदार पंतप्रधानांना भेटणार

नवी दिल्ली: एकीकडे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जावा म्हणून राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा म्हणून शिवसेनेचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी शिवसेनेने पंतप्रधानांची वेळही मागितली आहे. त्यामुळे संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची आज बैठक पार पडली. यावेळी राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. मराठा आरक्षणाापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या ११ प्रश्नावर आम्हाला पंतप्रधानांना भेटायचं आहे. पंतप्रधानांची आम्ही वेळ मागत आहोत. वेळ मिळताच पंतप्रधानांना भेटून आमच्या मागण्या सादर करणार आहोत, असं राऊत यांनी सांगितलं.
शिवसेना खासदारांच्या आज झालेल्या बैठकीतील तपशीलही राऊत यांनी दिला. महाराष्ट्रातील काही प्रश्न आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते. त्यांनी पंतप्रधानांना ११ मागण्यांचं निवेदन दिलं आहे. त्यातील अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातील आहेत. काही सामाजिक प्रश्न आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाशी संबंधित आहेत. रेल्वे मेट्रो, जीएसटी परतावा, पीक विमा प्रश्न आहे. या सर्व विषयांना चालना देण्यासाठी खासदारांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक झाली. आता या ११ मागण्यांवर आम्ही पुढील आठवड्यापासून पाठपुरावा करणार आहोत, असं राऊत म्हणाले.
खासदार विनायक राऊत यांनी मराठा आरक्षणावर स्थगन प्रस्ताव दिला आहे. तो स्विकारला जावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव स्विकारावा. मग आमचा अभ्यास किती दांडगा आहे ते पाहावं, असं आव्हानच त्यांनी दानवेंना दिलं. शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे, असं रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केलं होतं. त्याचाही राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दात समाचार घेतला. आम्ही त्यांची शिकवणी लावू. त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू. कोचिंग करू त्यांचे. पण आरक्षण द्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोकं मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे, असं ते म्हणाले.



