उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याचा पच्छाताप; शरद पवारांची संजय राऊतांसमोर नाराजी!

मुंबई : महाविकास आघाडीची स्थापना करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे. शनिवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शरद पवार यांनी तातडीने भेटीसाठी सिल्वर ओक या निवासस्थानी बोलावून घेतले होते. या दोन्ही नेत्यांची जवळपास एक तास चर्चा झाली. विशेष म्हणजे या भेटीची माहिती प्रसारमाध्यमांनाही कळली नव्हती. एरवी संजय राऊत शरद पवारांच्या प्रत्येक भेटीची माहिती देतात; मात्र कालच्या भेटीची माहिती देणे त्यांनी टाळल्याचे दिसून आले.
या भेटीत शरद पवारांनी, माझा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत नसल्याची माहिती राऊतांना देत नाराजी व्यक्त केल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी केला आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालादरम्यान ‘पश्चिम बंगाल ते पंढरपूर’ या चर्चासत्रात ते बोलत होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून सर्वांत मोठी चूक केल्याची नाराजी शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांना बोलून दाखवली.
एकनाथ शिंदे किंवा तुम्हाला मुख्यमंत्री केलं असतं तर बरं झालं असतं, असे पवारांनी म्हटल्याचे थत्ते यांनी सांगितले. थत्ते म्हणाले की, बाळासाहेबांनी कधीही स्वबळावर सत्ता स्थापन केली नाही, शरद पवार हे कधी महाराष्ट्राचे ममता बॅनर्जी होऊ शकले नाहीत. उद्धव ठाकरेंना ते कदापि शक्यच नाही. शरद पवारांनी आयुष्यभरात कधी ५२-५५ आमदारांच्या पुढे सत्ता आणली नाही. शिवसेनेला ते शक्य नाही आणि ममता बॅनर्जी महाराष्ट्रात येऊन त्यांच्या तारणहार बनतील, अशी अपेक्षाही नाही.
ममतांची राजकीय शैली महाराष्ट्राच्या पचनी पडणारी नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडे फडणवीसांच्या विरोधात उभे करण्यासाठी एकही सक्षम नेतृत्व नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये फाटाफूट अटळ आहे ती लवकरच होईल, शिवसेनेतच अनेक जण नाराज आहेत. सेना आतून पोखरली गेली आहे. पक्षांतर्गत खदखद आहे, असा दावाही थत्तेंनी केला आहे.




