Top Newsराजकारण

आम्हाला अडवू नका, परिणाम चांगले होणार नाहीत; राकेश टिकैत यांचा इशारा

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या ८ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. शेतकरी नेते आणि केंद्रातील मोदी सरकार दोन्ही आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. काही महिन्यांपूर्वी चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही काहीच उपयोग झाला नाही. यातच आता संयुक्त किसान मोर्चाने उत्तर प्रदेश येथील मुझफ्फरनगरमध्ये महापंचायतीचे आयोजन केले आहे. यावेळी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, तर याचे परिणाम चांगले होणार नाही, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.

पंजाबमधून सुमारे दोन हजार शेतकरी मुझफ्फरनगरला पोहोचण्याची शक्यता आहे. दिल्ली सीमेवरील आंदोलनस्थळावरून ४०० ते ५०० शेतकरी महापंचायतीकडे रवाना होतील. टिकरी आणि गाजीपूर सीमेवरून शेतकरी बसने मुझफ्फरपूरसाठी निघत आहेत. शुक्रवारी रात्री दोन बस मुझफ्फरनगरसाठी रवाना झाल्या, शनिवारी सकाळी आणखी दोन बस गेल्या असून, इतर बस रात्री शेतकऱ्यांना घेऊन निघतील. महापंचायतीसाठी गावांमधून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत, अशी माहिती राकेश टिकैत यांनी दिली.

महापंचायतीसाठी किती शेतकरी येतील, हे सांगणे शक्य नाही. मात्र, मोठ्या संख्येने शेतकरी पोहोचतील एवढे नक्की. शेतकऱ्यांना महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कोणीही जर आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना बॅरिकेट्स तोडून महापंचायतीत पोहोचू, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना मुजफ्फरनगरला नेण्यासाठी ५०० बसेस भाड्याने घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळत आहे. ही महापंचायत केवळ निवडणुकीशी जोडलेली नाही. उत्तर प्रदेशमध्ये सहा महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. तेथील शेतकरी अडचणीत आहेत. विजेचे दरही सर्वाधिक आहेत. २०१६ पासून उसाच्या दरात वाढ झालेली नाही. केवळ पाच रुपये, पाच पैसे प्रति किलोने दरात वाढ करून तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान करताय का, अशी विचारणा राकेश टिकैत केली आहे.

दरम्यान, राकेश टिकैत यांचे सहकारी गुरनाम सिंग चदूनी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. शेतकरी आंदोलनासाठी सुमारे ६५० शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. ३७ हजार शेतकऱ्यांवर गुन्हे नोंदवले आहेत. मागण्या मान्य करण्याचे दोनच मार्ग आहेत. संपूर्ण देशात भाजपला पराभूत करायचे. मात्र, नवीन सरकार आपल्या मागण्या मान्य करेल का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे, अशी शंका गुरनाम सिंग यांनी व्यक्त केली. तसेच शेतकरी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मोदी सरकारला आमचे म्हणणे मान्य करावेच लागेल. परंतु, भाजप सरकार गेल्यानंतर आपले म्हणणे ऐकले जाईल का, याबाबत साशंकता वाटते, असे सिंग यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button