
नॉटिंगहॅम : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाला इतिहास घडवण्याच्या संधीवर पावसानं आज पाणी फिरवले. इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांवर गुंडाळल्यानंतर भारतासमोर विजयासाठी २०९ धावांचे लक्ष्य होते. चौथ्या दिवसअखेर लोकेश राहुलची ( २६) विकेट गमावत भारतानं १ बाद ५२ धावा केल्या. त्यामुळे पाचव्या दिवशी १५७ धावा करून टीम इंडियाला विजय मिळवण्याची संधी चालून आली होती. पण, पाचव्या दिवसाचा साडेतीन तासांचा खेळ वाया गेला आहे आणि अजूनही पावसाची बॅटिंग सुरूच असल्यानं पाचव्या दिवसाचा खेळ अखेरीस रद्द करावा लागला.
पहिल्या डावात १८३ धावांवर इंग्लंडला गुंडाळून भारतानं २७८ धावांसह ९५ धावांची आघाडी घेतली. कर्णधार जो रुटनं दुसऱ्या डावात १७२ चेंडूंत १४ चौकारांसह १०९ धावा केल्या. जसप्रीत बुमराहनं ५, मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी २ बळी टिपले. लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश राहुलनं सॉलिड खेळ केला, परंतु ३८ चेंडूंत २६ धावा करून त्याला माघारी जावं लागलं. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारानं आणखी धक्का बसू दिला नाही. रोहित १२ व पुजारा १२ धावांवर खेळत असून टीम इंडियानं दिवसअखेर १ बाद ५२ धावा केल्या होत्या. नॉटिंग्हॅमवर इतिहास रचण्यासाठी भारताला आणखी १५७ धावांची गरज होती, परंतु पावसानं पाचव्या दिवसाचा खेळ वाया घालवला. सामना अनिर्णीत राहिल्यानं दोन्ही संघांना ४-४ गुण दिले गेले आहेत.




