परमबीर सिंग यांच्यावर चौकशीअंती कारवाई होईल: नवाब मलिक
कटकारस्थान करुन सरकार व गृहमंत्र्यांना बदनाम केले; अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाही

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी कटकारस्थान करुन महाविकास आघाडीला आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे त्याची चौकशी होईलच व त्यादृष्टीने कारवाई होणार. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही असा पक्षाने निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या चिठ्ठीवर जो वाद निर्माण झाला आहे त्यावर नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. परमबीर सिंग यांनी बदली झाल्यावर ही चिठ्ठी लिहिली आहे. परमबीर सिंग यांनी १७ मार्चला बदली होणार हे माहीत असताना १६ मार्चला काहीतरी प्रश्न विचारुन चॅट पुरावा तयार केला. त्या चॅटनुसार गृहमंत्री अनिल देशमुख हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाझेना भेटले असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचदरम्यान अनिल देशमुख हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी त्यांना कोरोना झाला. १५ दिवस हॉस्पिटलमध्ये नंतर २७ फेब्रुवारीपर्यंत गृहविलगीकरणात होते. २७ फेब्रुवारीला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. असे असताना पुरावा तयार करून कटकारस्थान करत बदनाम करण्याचा प्रयत्न होता असेही नवाब मलिक म्हणाले. हा आरोप गंभीर आहे याची चौकशी होईल या चौकशीत जे निष्पन्न होईल त्यादृष्टीने कारवाई करण्यात येईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.




