राजकारण

आमचा लढा न्याय हक्कासाठी; चळवळ अराजकीय : खा. संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर: आमची चळवळ अराजकीय आहे. कोणत्याही पक्षाचा त्याच्याशी संबंध नाही. आमचा लढा सरकारविरोधात नाही. समाजाच्या न्याय हक्कासाठी आमचा लढा आहे, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी आज स्पष्ट केलं.

किल्ले रायगडावरून आंदोलनाची घोषणा केल्यानंतर संभाजीराजे यांची सकल मराठा संघटनेच्या नेत्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. आमचा कुणालाही विरोध नाही. आमच्या मागण्याही साध्या आहेत. त्यावर मी उपायही दिले आहेत. आम्ही पाच मागण्या केल्या आहेत. त्याच भोसले समितीने सांगितल्या आहेत. आम्ही सांगितलेल्या पाच मागण्या पूर्ण करण्यासाठी कोर्टाची गरज नाही. त्या सरकारने लागू कराव्यात. आमचा लढा सरकारविरोधात नाही. समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. आमच्या आंदोलनात यायला कोणालाही अटकाव नाही. आमची अराजकीय चळवळ आहे. मराठा समाजाला न्याय मिळून देण्याचा आमचा उद्देश आहे. यापेक्षा कोणताही उद्देश नाही, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

उदयनराजेंना भेटणार

यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दोन्ही राजे एकच आहेत. त्यात वेगळेपण नाही. दोन्ही राजे देखणे आहेत, असं सांगतानाच उदयनराजेंशी भेटून चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना मेसेज केला आहे

आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून खासदार राहुल शेवाळे हे संपर्कात होते, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून फोन आला होता. अजित पवार भेटू इच्छित असल्याचं कळवण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांना व्हॉट्सअ‍ॅपवरून मागण्या कळविल्या आहेत. त्यामुळे पुन्हा काय चर्चा करायच्या? म्हणून अजितदादांना भेटलो नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत तुमची काही चर्चा झाली आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. तेव्हा पक्ष आणि संघटना स्थापन करण्याचा प्रश्नच नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या बैठकीत पक्ष, संघटना स्थापन करण्यावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. त्या दिवशी पत्रकारांनी विचारलं म्हणून मी त्याला उत्तर दिलं, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांना शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंबाबत प्रश्न विचारला असता संभाजीराजेंनी या प्रश्नावर थेट उत्तर दिलं. त्या व्यक्तिबाबत मला का विचारता?. माझी त्यांच्याशी तुलना का करता? मराठा समाजासाठी कुणी आंदोलन करत असेल तर त्यांचं कौतुकच आहे. पण त्यात मला का ओढता?, असा सवाल त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button