Top Newsराजकारण

दि. बा. पाटलांच्या नावासाठी गावागावात मशाल मोर्चा, १६ तारखेला विमानतळाचे काम बंद

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज ९ ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी ५०० प्रकल्प ग्रस्त, भूमिपुत्र या मशाल मोर्चात सहभागी झाले होते. त्यानंतर दि. बा. पाटील मंगल कार्यालय या ठिकाणी मशाल मोर्चा येऊन थांबला. ग्रामीण भागात, तालुक्यात शहरात संध्याकाळी ठिकठिकाणी मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात १६ तारखेला विमानतळाचे काम बंद आंदोलन करणार त्याचबरोबर दिल्लीत सुद्धा नेते मंडळींच्या भेट घेणार आहेत.

नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांनी केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात संध्याकाळी हा ‘मशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.

मशाल मोर्चा हा १० आणि २४ जून रोजी झालेल्या नामकरण आंदोलनाच्या कार्यक्रमाचा पुढील टप्पा आहे. या मशाल मोर्चासाठी ज्या मशाली प्रज्वलीत केल्या जातील त्यांची सुरुवात लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून म्हणजे उरण तालुक्यातील जासई येथून, महापुरुष, हुतात्म्यांना तसेच लोकनेते दि. बा. पाटील यांना वंदन करून करण्यात येईल. त्यासाठी आज एक मोठी क्रांती ज्योत प्रज्वलीत केली गेली. यावेळी कृती समितीचे सदस्य आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विविध जिल्ह्यांतून, तालुक्यातून व विभागातून आलेले विशेष प्रतिनिधी, त्या मुख्य मोठ्या ज्योतीद्वारे आपल्या मशाली प्रज्वलीत करतील आणि आपापल्या ठिकाणी घेऊन जातील.

त्यानंतर विशेष प्रतिनिधींनी नेलेल्या मशालीची ही क्रांती ज्योत, त्या त्या ठिकाणच्या गावागावातून आलेले प्रतिनीधी, गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या गावासाठी ही क्रांती ज्योत प्रज्वलीत करतील आणि गावात वा विभागात ‘मशाल मोर्चा’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button