फडणवीसांनी निवडणुका पुढे ढकलल्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात : नाना पटोले

मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत असल्यामुळे भाजपकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकल्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आलं यामुळे भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आंदोलन करावे असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाली असून राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डेटाची मागणी करत आहोत केंद्र सरकारने डेटा दिल्यास ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर तोडगा निघेल असे सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे.
ओबीसी आरक्षणावरुन काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले असून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तत्कालीन फडणवीस सरकारने जि.प. निवडणुका पुढे ढकल्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकल्याने फक्त राज्य नाही तर देशातील ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आंदोलन करावे असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
ओबीसी समाज, मराठा समाज तसेच इतर जातींच्या समाजाला आरक्षण भाजपला द्यायचे नाही. ओबीसींवर भाजपने अन्याय केला असून भाजपमुळेच आरक्षण आरक्षण मिळाले नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. आरक्षणाच्या बाबतीत भाजप अडचणी आणत आहे. ओबीसी नेत्यांवर आरोप करुन त्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची काम भाजपकडून करण्यात येत आहेत. काही झारीतले शुक्राचार्य आहेत. तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये तेच महाधिवक्ता होते आताही तेच आहेत तरी केसचा निकाल विरोधात येत आहे. यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.




