राजकारण

भाजप नेते म्हणजे सत्तेसाठी ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ : अरविंद सावंत

बाळासाहेबांचे आशीर्वाद नसते, तर महाराष्ट्रात दुर्बिणीने शोधूनही सापडले नसते!

Arvind Sawant strongly criticizes BJP Leaders

मुंबई : अदर पूनावाला यांना देण्यात आलेल्या धमकीवरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे. त्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. अदर पूनावाला यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. माणसाचा जीव वाचवण्याचं काम ते करतात, ते ही महाराष्ट्रात. याचा आम्हाला आदर आहे. शिवसेना आक्रमक संघटना असली तरी आम्ही ही भाषा वापरत नाही, असं शब्दात शिवसेनेवर केल्या जाणाऱ्या आरोपांना सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राजू शेट्टी यांनी एक व्हिडीओ केला. त्यांच्या संघटनेचं नाव स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. त्यांनी त्याचा उल्लेख SSS असा केला, हे SS म्हणजे शिवसेना समजले. पूनावाला यांना धमक्या देऊन आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचं काम कसं करणार? शिवसेनेची बदनामी करण्यासाठी आरोप केला जात आहे. शिवसेनेनं धमकी दिलेली नाही. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या उक्तीप्रमाणे यांना सत्तेवर येण्याची घाई झाली आहे. पश्चिम बंगालच्या जनतेनं यांना धडा शिकवला. जो महाराष्ट्राने आधीच दिला होता, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद नसते तर हे दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते, अशी खोचक टीकाही सावंत यांनी भाजपवर केली आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीतील विजयानंतर विरोधकांना जर राज्यात सत्तांतर होईल असं वाटत असेल तर बंगाल आणि इतर राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांवरुन केंद्र सरकारनेही राजीनामा दिला पाहिजे. या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारणार का? असा सवालही सावंत यांनी भाजप नेत्यांना केलाय.

शेलारांसारख्या पोरकट लोकांनी आपलं ज्ञान पाजळू नये

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेलाही सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भाजप शिवसेनेच्या कुबड्यावर होता. आमच्याच कुबड्या आणि शिडी वापरुन भाजप महाराष्ट्रात वाढला. अन्यथा भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता. संघाच्या शाखेवरही दोन माणसं उभी असायची. ही कुबडी विसरायची म्हणजे कृतघ्नपणा असल्याचं सावंत म्हणाले. बेळगावचा इतिहास माहिती नाही अशा पोरकट लोकांनी आपलं ज्ञान पाजळू नये, असा टोलाही सावंत यांनी शेलारांना लगावलाय.

दुसरीकडे पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर तिसरा पर्यायाची चाचपणी पुन्हा एकदा सुरु झालीय. तिसऱ्या पर्यायासाठी हा निकाल एकप्रकारे संजिवनी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे संस्थापक आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या पर्यायाची गोष्ट करणाऱ्या शिवसेनेचे नेतेही बोलत आहेत. दरम्यान खासदार अरविंद सावंत यांनी राज्य सरकारची प्राथमिकता कोरोना विरोधातील लढाई असल्याचं म्हटलंय. कोरोनाचं संकट दूर झाल्यावरच तिसऱ्या पर्यायाबाबत चर्चा होईल, असंही सावंत यांनी म्हटलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button