
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन केलं. त्यावरून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सोमय्यांवर जहरी टीका केली. रावणालाही वाटत असेल हा आपल्या तावडीत सापडावा, अशी खोचक टीका निलम गोऱ्हे यांनी केली.
निलम गोऱ्हे आज षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही खोचक टीका केली. किरीट सोमय्या आजच्या दिवशी रावण दहन करत आहेत. रावणाला ही वाटत असावे हा माझ्या तावडीत सापडायला हवा. किरीट सोमय्या हे बेरोजगार आहेत. रोजगार म्हणून रोज काहीतरी ते करत असतात, असा चिमटा निलम गोऱ्हे यांनी काढला.
शिवसेना हे आपले दायित्व साजरे करत आहे. तर काही परप्रांतीयांना आणून राजकारण करत आहेत, असं सांगतानाच शिवसेना ही मुंबईची आई आहे. काहीजण दाईची भूमिका घेत आहेत, असा टोला त्यांनी मनसेला लगावला.
मुश्रीफांना अटक होणारच
दरम्यान, रावणाचं दहन करण्यापूर्वी किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती हल्ला चढवला. महाराष्ट्राची जनता ठाकरे-पवार माफिया सरकारच्या राक्षसी वृत्तीचं दहन करणार, हे मी वचन देत आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि ४० चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील. अर्धे कोर्टात धक्के खात असतील, आर्धे ईडी, कुणी सीबीआय तर कुणी इन्कम टॅक्सकडे, तर कुणी मुंबई पोलिसात असेल. कालपासून जेलमध्ये जायची सुरुवात झालीय. आम्ही एक वर्षापूर्वीच मंत्री जितेंद्र आव्हाड जेलमध्ये जाणार असं सांगितलं होतं. अखेर जितेंद्र आव्हाडांना अटक झाली. जितेंद्र आव्हाडांनी आनंद करमुसेंचं अपहरण केलं. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आश्रय दिला होता. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनाही जेलमध्ये जावं लागणार. त्यानंतर खासदार भावना गवळी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना अटक होणार. शिवेसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार, असं सोमय्या यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, त्यांचे नातू पार्थ पवार, आमदार रोहित पवार कुठे गेले सर्व पवार? देशातील सर्वात मोठी आयकर विभागाची धाड सुरू आहे. धाडीचा नऊवा दिवस आहे. पवारांनी किती माया (पैसे) जमावली आहे ते काही दिवसांत बाहेर येणार. अजित पवारांच्या बेनामी प्रॉपर्टीचा मी खुलासा केला. याबाबत अजित पवारांकडून आजपर्यंत काहीही स्पष्टता आलेली नाही. या घोटाळेबाजांना धडा शिकवण्यासाठी चला आपण रावण दहन करुया, असं सोमय्या म्हणाले.
आज आम्ही ठाकरे-पवार घोटाळेबाज सरकारच्या भ्रष्टाचारी वृत्तीचं दहन करत आहोत. या घोटाळेबाज सरकारला घालवण्यासाठी मला अंदमान-निकोबार जेलमध्ये जावं लागलं तरी मी हसत-हसत जाणार. माझ्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केलाय. एकवेळा काय, सतरा वेळा जेलमध्ये जाणार. पण या महाराष्ट्राला घोटाळेमुक्त सरकार करुन दाखवणारच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.




