
मुंबई : शालेय शिक्षणमंत्री तथा काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्याविरेाधात थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करण्यात आलीय. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात गायकवाड यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याची योग्य दखल न घेतल्यामुळे ही तक्रार करण्यात आलीय. थेट हायकमांडकडे तक्रार केल्यामुळे गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
चिनाय आणि एमव्हीएलयू ही कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये अनुदानित महाविद्यालये आहेत. या ठिकाणी ८०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. मात्र महाविद्यालयाची ही जागा खासगी बिल्डरांच्या घशात घातली जाणार आहे. यामुळे ही महाविद्यालये वाचविण्यासाठी शर्मा यांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे वेळोवेळी महाविद्यालयाची जागा वाचवण्याबाबात मागणी केली होती. मात्र केलेल्या तक्रारीला गायकवाड यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असं शर्मा यांचं मत आहे. याच कारणामुळे आपण काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून याविषयी तक्रार केली, अशी माहिती राजेश शर्मा यांनी दिली. दरम्यान, थेट सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार गेल्यामुळे वर्षा गायकवाड काय भूमिका घेणार तसेच तक्रारीचे उत्तर मागवण्यात आले तर त्या काय स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




