Top Newsराजकारण

शिवसेनेचा राणेंना शह; चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होणार !

मुंबई : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरून चांगलाच वाद पेटला होता. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाला विरोध केला होता. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतीरादित्य शिंदे उपस्थितीत ९ ऑक्टोबरला विमानतळाचे उद्घाटन होणार अशी माहिती उद्योगमंत्री उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली आहे. उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हा प्रकल्प हाती घेऊन आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करुन हे विमानतळाचे काम पूर्ण केले आहे. एकूण २८६ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली. सुमारे ५२० कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. आय आर बी, सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. यांना विमानतळ उभारणी, फायनान्स तसंच ऑपरेशन्ससाठी लीजवर हे काम देण्यात आले आहे. त्यांनी हा खर्च केला आहे, असंही देसाई यांनी सांगितलं.

विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा, रस्ते विकास, संरक्षण भींत या सारखी कामे एम आयडीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यासाठी एम आयडीसीच्या माध्यमातून १४ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे, असंही देसाई यांनी सांगितलं.

विमान पत्तन प्राधिकरण, नागर विमानन माहानिदेशालय यांच्या तर्फे लागणारे सर्व परवाने प्राप्त झाले आहेत. विमानतळासाठी विकास करार झाले आहेत. या विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. विमानतळामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळेल, पर्यटन व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. कोकणाचे आकर्षण असलेल्या समुद्रापर्यंत आता विमान वाहतूक सुरू झाल्यामुळे अधिकाअधिक पर्यटकांना पोहचता येईल. कोकणवासियांच्या उत्कर्षाचा काळ सुरू झाला आहे, असंही देसाई म्हणाले.

विशेष म्हणजे, नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असणे काहीही गरजेचं नाही, असं म्हणत टीकास्त्र सोडले होते. तर दुसरीकडे, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ‘विमानतळाचं उद्घाटन होणार आहे, चालत्या गाडीत शिरण्याचा प्रयत्न म्हणजे विनायक राऊत आहेत. चालत्या गाडीत शिरल्याने श्रेय मिळत नाही. जर तुमचं श्रेय होतं तर गेल्या १५ वर्षांत विमानतळाचं उद्घाटन का नाही झालं. जर तुमची मेहनत होती तर गेली दोन वर्षे तुम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून का बसला होतात. राणेंचा पाठपुरवठा आणि भाजप याआधारावर कोकणवासीयांना ही सेवा मिळणार आहे’ असा दावा केला होता. पण, आता सेनेनंही उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होणार असं म्हणत भाजप आणि राणेंना शह दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button