राजकारण

जात पडताळणीबाबत तक्रार आली तर चौकशी करु : धनंजय मुंडे

मुंबई : मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर खंडणी तसेच चुकीचे कागदपत्रे सादर करुन अनुसूचित जाती प्रवर्गाचे लाभ घेतल्याचा आरोप केला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठं विधान केलंय. वानखेडे यांना जे सर्टिफिकेट देण्यात आलंय त्याबाबत जर कोणी तक्रार केली तर त्याची चौकशी केली जाईल, असं मुंडे यांनी म्हटलंय.

समीर वानखेडेंना जे सर्टिफिकेट देण्यात आलंय त्याबाबत कोणी तक्रार केली, तर त्याची चौकशी करू. सामाजिक न्याय विभागाकडे कोणी तक्रार केल्यास चौकशी केली जाईल. ही चौकशी जातपडताळणी कायद्याप्रमाणे केली जाईल, असे धनंजय मुंडे म्हणाले.

नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असून एका गरीब अनुसूचित प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्याची नोकरी त्यांनी हिसकावून घेतली आहे. त्यांचा जन्माचा दाखला आणि जात प्रमाणपत्र खोटं निघालं तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. एक अल्पसंख्याक उमेदवार बनावट दाखले सादर करुन अनुसुचित प्रवर्गातून अधिकारी झाला. असा आरोप मलिक यांनी वानखेडे यांच्यावर केला. तसेच याच न्यायाने १५ कोटी मुस्लिमांना अशी नोकरी मिळेल काय?, असा सवालदेखील त्यांनी केला.

खोटे कागदपत्रे सादर करुन वानखेडे यांनी नोकरी बळकावली असा आरोप मलिक यांनी केलेला आहे. आपला आरोपात सत्यता आहे, हे दाखवण्यासाठी मलिक अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कागदपत्रे सादर करत आहेत. याच कागदपत्रांच्या आधारे त्यांनी वानखेडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी धर्मांतर करून लग्न लावलेलं आहे. मुस्लीम व्यक्तीने धर्मांतर केले असेल तर त्याला शेड्युल कास्टचा लाभ घेता येत नाही, असा महाराष्ट्र शासनाचा नियम आहे. वानखेडे यांचा दाखला बोगस असून त्याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button