
मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघे मिळून शिवसेनेला कमकुवत करत असल्याचा आरोप केला होता. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी समन्वय समितीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणतेही वाद नाहीत. कोणताही असमन्वय नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेबद्दल विचारले असता एकनाथ शिंदे यांनी स्वबळाचा नारा दिला यात गैर काय? प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं. तिन्ही पक्षांमध्ये कोणीही नाराज नाही, महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असंही शिंदे म्हणाले. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
महाविकास आघाडीमध्ये कोणताही विसंवाद नाही. कोणताही समज गैरसमज नाही, तिन्ही पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. महाराष्ट्र सरकारनं केलेल्या कामाचं सुप्रीम कोर्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे.
आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळं आणि इतर विषयांवर चर्चा झाली. प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते या बैठकीला हजर होते. महामंडळांसदर्भात चर्चा झाली तीन पक्षांना महामंडळाचं वाटप होईल. आमदारांच्या संख्येप्रमाणं महामंडळाचं वाटप होईल, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपद अखेर राष्ट्रवादीला, तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूरचं अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्यात आलं आहे. शिर्डी साई संस्थान अध्यक्षपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी दावा केला होता. आजच्या बैठकीत शिर्डीचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर पंढरपूरचं अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला.




