रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर दोन दिवसांत आढळले पाच मृतदेह
बार्ज दुर्घटनेमधील बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह असल्याचा अंदाज

अलिबाग : मागील दोन दिवसात रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर पाच अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अलिबाग आणि मुरूडच्या समुद्रकिनाऱ्यावर हे मृतदेह आढळून आले आहेत.
रायगड जिल्ह्याच्या मुरूड समुद्रकिनारी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. अर्धनग्न अवस्थेत आढळून आलेल्या या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. शनिवारीही दिवसभरात अलिबाग तालुक्यातील नवगाव, दिघोडी, आवास समुद्रकिनारी एकूण चार मृतदेह आढळून आले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अलिबागच्या उत्तरेला असलेल्या या समुद्रकिनाऱ्यावर आढळून आलेल्या या मृतदेहांची ओळख पटलेली नसून पोलीसांकडून या मृतदेहांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान, अलिबाग आणि मुरुडच्या किनाऱ्यावर आढळून आलेले हे मृतदेह तोक्ते चक्रीवादळात मुंबई – हाय जवळ बुडालेल्या बार्जमधील बेपत्ता असलेल्या व्यक्तींचे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, रायगड जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क करण्यात आले असून किनारपट्टीवर शोध मोहीम घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हा प्रशासन आणि रायगड पोलीस हे मुंबईतील यलो गेट पोलीसांच्या संपर्कात असल्याची माहिती दिली. ओएनजीसीमधीलही काही अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर पुढईल माहिती जाहीर करण्यात येईल असं तूर्तास रायगड जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.




