पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीत वाढ; राष्ट्रवादी राज्यव्यापी आंदोलन छेडणार

मुंबई: पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाल्याने या दरवाढी विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खत दरवाढी विरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने आता दुसरा धक्का देत खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केलं असून केंद्राच्या या धोरणाचा निषेध म्हणून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या खतांच्या दरवाढीचा निषेध करते. आमचा शेतकरी बांधव याविरोधात आंदोलन करणार आहे त्या आंदोलनास देशभरातून प्रतिसाद मिळेल हा मला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 16, 2021
पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीनंतर आता केंद्रसरकारने दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. १०.२६.२६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली तर डीएफएची किंमत ७१५ ने वाढली आहे. डीएफए जी अगोदर ११८५ रुपये किंमत होती ती आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ च्या ५० किलोच्या पोत्याला ११७५ ऐवजी १७७५ रुपये मोजावे लागणार आहे. पोटॅशच्या किंमतीही वाढल्या आहेत, असेही त्यांनी सांगितलं. देशातील खतांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं पाप केंद्रातील भाजप सरकारने केलं आहे. राष्ट्रवादीतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्हयात शेतकऱ्यांवर वेगळया प्रकारचा बोजा लादला असून केंद्राने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांन केली आहे.
दरम्यान, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. डीएपी खतांची वाढलेली किंमत कमी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. डीएपी खतांच्या किमती वाढल्यानं शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. कृषीमंत्री दादा भुसे यांनी केंद्र शासनाला पत्र लिहून खतांच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे. ज्या प्रमाणे युरियाला सबसिडी देण्यात येते त्या प्रमाणे इतर खतांवर ही सबसिडी देण्याची मागणी ही दादा भुसे यांनी केंद्राकडे केली आहे.
दीड लाख मेट्रीक टन युरियाचा अतिरीक्त साठा
कृषी अधिकाऱ्यांनी वरीष्ठ पातळीवर दर सोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी. यंदा हवामान विभागाने मान्सून चांगला होईल असा अंदाज वर्तविला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने खतांची मागणी एकाचवेळी वाढली. त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेऊन यंद दीड लाख मेट्रीक टन युरीयाचा अतिरीक्त साठा करण्याचा निर्णय गेतला आहे. त्यासाठी विदर्भ विभागासाठी विदर्भ सहकारी पणन मंडळ आणि महाराष्ट्र कृषी औद्योगिक मंडळ या दोन यंत्रणांच्या सहकार्याने सर्व जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे, असंही दादा भुसे म्हणाले.




