
रत्नागिरी : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळादरम्यान राज्यातील किनारपट्टी भागात जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याची तसेच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
तौक्ते चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या जवळून जात असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने प्रशासनाने विशेष दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील मागच्या वर्षीच्या चक्रीवादळाचा अनुभव घेता मोठ्या प्रमाणात झाडे तुटून वीज प्रवाह खंडीत होण्याची शक्यता आहे. वीज वितरण यंत्रणांना जिल्ह्यातील रुग्णालये, ऑक्सिजन उत्पादन व रिफीलिगं कपंन्या करीता विशेष तैनात करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील महत्वाचे रस्ते, रुग्णालय, तसेच आत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कार्यालयाजवळील झाड्याच्यां फांद्या तुटून नुकसान होण्याची शक्यता असल्याने कालपासून झाडे व फांद्या कापण्याचे काम सुरु आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात चक्रीवादळाचा फटका बसला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. घरांचीही पडझड झाली आहे. इचलकरंजीत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
रत्नागिरीत मध्यरात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असून तालुक्यातील १०४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज पहाटेपासून राजापूर रत्नागिरी तालुक्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून आज सायंकाळापासून गुहागर आणि दापोलीत संचारबंदी
किनारपट्टी भागातील पाच तालुक्यांना अलर्ट करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटे २ पासून सोसाट्याचा वारा सुरु आहे. रात्री २ पासून जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज गायब झाली असून किनारपट्टी भागात वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे.




