ऑक्सिजनचा ‘तो’ टँकर पुण्यात अडवला, मी फोन करुन वेगळ्या भाषेत बोलल्यानंतर सोडला : थोरात

अहमदनगर: ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेल्या नगर जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक वेगळेच नाट्य रंगल्याची माहिती आता समोर येत आहे. अहमदनगरमध्ये ऑक्सिजनअभावी मंगळवारी रात्री अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. या रुग्णांसाठी ऑक्सिजनचा एक टँकर तातडीने मागवण्यात आला होता. मात्र, हा टँकर रात्री पुण्याच्या हद्दीत अडवण्यात आला. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हस्तक्षेप करून हा ऑक्सिजन टँकर सोडवला. त्यामुळे रुग्णांचा जीव थोडक्यात वाचला.
बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधून यासंदर्भात माहिती दिली. कालची रात्र आमच्यासाठी भयानक होती. ऑक्सिजनचा टँकर वेळेत पोहोचला नसता तर किती रुग्णांचे मृत्यू झाले असते, हे सांगता येऊ शकत नाही. नगरकडे येणारा हा ऑक्सिजन टँकर पुण्यात थांबवण्यात आला होता. मात्र, मी फोन करून वेगळ्या भाषेत समज दिल्यानंतर हा टँकर सोडण्यात आला, अशी धक्कादायक माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्याला एकूण ६० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज होती. मात्र, काल अचानक जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केल्यामुळे ऑक्सिजन जिल्ह्यात पोहोचला. यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी रुग्णालयांमध्ये पहाटे तीन वाजेपर्यंत ऑक्सिजन वितरीत करण्यात आला. त्यामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गुरुवारपासून नगर शहरात ऑक्सिजन प्लांट सुरू होत आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजन तुटवडा भासणार नाही.




