आरोग्य

राज्याला आता रोज मिळणार ६० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स

मुंबई : आता राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनची चिंता मिटण्याची शक्यता आहे. कारण दिलासादायक बाब म्हणजे आता राज्याला रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होणार आहे. सुरुवातीच्या काळात राज्यात दररोज १९ हजार रेमडेसिवीर उपलब्ध होत होते. तर या आकड्यात भर पडली असून हा आकडा ३५ हजारवर जाऊन पोहोचला आहे. तर आता हा आकडा ६० हजारांवर जाणार असून महाराष्ट्र राज्याला दररोज ६० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार आहेत.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची वाढ होत असताना दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक वणवण करताना दिसत आहे. मात्र, आता ही वणवण थांबणार आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, राज्यातील सर्वच रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता नसते. केवळ १० टक्केच रुग्णांना रेमडेसिवीरची आवश्यकता असते. त्याप्रमाणे त्याचा वापर केल्यास रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवू शकत नाही.

कोरोनाची पहिली लाट ही ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या दरम्यान ओसरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे राज्यातील ज्या सात कंपन्या रेमडेसिवीरचे उत्पादन करतात, त्यांनी ते उत्पादन डिसेंबरपासून थांबवले होते. तरी देखील १ मार्चपर्यंत विविध राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर उपलब्ध होते. मात्र, दुसरी लाट आल्यानंतर मोठ्या संख्येने रेमडेसिवीरचा वापर करण्यात आला. त्यानंतर रेमडेसिवीरचा तुटवडा होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी पुन्हा एकदा रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करण्यास सुरुवात केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button