किराणा मालाची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु ठेवण्याचा विचार : टोपे

मुंबई : राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच किराणा दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो असंही टोपे यांनी सांगितलं.
निर्बंध अधिक कडक करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. ब्रेक द चेन साधायचे असेल तर यापुढे गरज पडेल तसं आणखी गोष्टी कडक केल्या जातील. येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केले पाहिजेत. राज्यात कडक निर्बंध लागू केलेले असतानाही अनेक लोक विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाताना दिसत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी किराणा दुकाने ७ ते ११ या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची चर्चा झाली आहे. जिल्हास्तरावर याबाबत निर्णय घेतले जावे याबाबतही चर्चा झाली, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.
राज्यात ऑक्सिजनची मोठी मागणी आहे. सध्या 1550 टन ऑक्सीजन दररोज मिळतोय. केंद्र सरकारने 1800 टनापर्यंत जाऊ शकतो असं सांगितलं. मात्र पुढे आणखी ऑक्सिजन मिळाला नाही तर अडचण होईल. राज्याबाहेरुन भिलाई, बिल्लारी आणि विशापट्टणम येथून काही प्रमाणात ऑक्सिजन आणतोय. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचे युनिट बसवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने घ्यावा, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.
रेमडेसिवीरच्या कंपन्यांना जादा प्लान्ट उभारण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. ऑक्सिजन कॉन्सट्रेशन मशीन त्वरीत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. कारण ऑक्सिजनची गरज वाढतेय तेवढे सिलेंडर खाजगी हॉस्पिटल्सकडे नाहीत. इंडस्ट्रीचे ऑक्सिजन सिलेंडर खाजगी रुग्णालयांना उपलब्ध करून दिले पाहिजेत.




